मिरजगाव -नगर-सोलापूर रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजने मुश्कील झाले आहे.वाहनचालकांना वाहने चालविणे म्हणजे कसरतच झाली आहे. दरेवाडी, वाळुंज, रुईछत्तीशी, घोगरगाव, माहीजळगाव, निमगाव डाकू या गावांतून जाणाऱ्या रस्त्यावर चार ते पाच फुटांचे खड्डे पडले आहेत.
या रस्त्यावरुन मोठ्याप्रमाणात जड वाहतूक होत आहे. मात्र रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच या खड्ड्यांमुळे वाहनांचेही नुकसान होत आहे. हलक्या चारचाकी व दुचाकी चालकांना तर रस्त्यावरुन नेणे म्हणजे दिव्य पार करणे, अशी अवस्था झाली आहे.
या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांत अनेकांना गंभीर इजा होत असून, खराब रस्त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी मिरजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष कुलदीप गगावणे यांनी केली आहे.आठ दिवसांत रस्ता दुरुस्त झाला नाही, तर कोणतेही निवेदन न देता रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.