पुणे – पुणे विभागातील इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी ठराविक परीक्षा केंद्रांची मक्तेदारी वाढली आहे. ती मोडीत काढण्यासाठी आणि सामूहिक कॉपीसह अन्य गैरप्रकारांना चाप बसविण्यासाठी विद्यार्थ्यांची “सरमिसळ’ केली जाणार आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
राज्यात एकाच वेळी इयत्ता दहावी, बारावीच्या घेण्यात येतात. यात पुणे वगळता अन्य विभागांत शहरी आणि ग्रामीण भागांत एकाच गावात दोन किंवा अधिक परीक्षा केंद्र असल्यास तेथे सरमिसळ करुन विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षा केंद्रावर बसविले जाते. यामुळे गैरप्रकारांना आळा घालणे सुलभ झाले. पुणे विभागात पूर्वी ही पद्धत होती. मात्र, सहा-सात वर्षांपूर्वीच ती बंद झाली होती.
पुणे बोर्डाच्या अध्यक्ष मंजुषा मिसकर यांनी पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांच्या कारभाराला शिस्त लावण्यासाठी हालचाली सुरूच ठेवल्या आहेत. पुणे बोर्डाकडून “सरमिसळ’ पद्धत सुरू करण्यासाठी सचिव औदुंबर उकिरडे यांनी प्रस्ताव पाठवला होता. त्यास राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्याकडून मान्यताही मिळालेली आहे. गणकयंत्र विभागाच्या वतीने ऑनलाइन सॉफ्टवेअरद्वारे विद्यार्थ्यांची सरमिसळ करण्यात येणार आहे.
“पुणे विभागात वर्षानुवर्षे ठराविक परीक्षा केंद्रावर ठराविक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातीलच विद्यार्थ्यांनीच परीक्षा देण्याची प्रथाही बंद करण्यात येणार आहे. फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावर अभ्यासपूर्ण रित्या “सरमिसळ’ पद्धत राबविण्यात येणार आहे.” – मंजुषा मिसकर, अध्यक्ष, पुणे बोर्ड
केंद्र संख्या बदलणार
पुणे विभागात दरवर्षी साधारणपणे दहावीच्या परीक्षेसाठी 2 लाख 70 हजार, तर बारावीसाठी 2 लाख 45 हजारापर्यंत विद्यार्थी असतात. दहावीसाठी 635 तर बारावीसाठी 411 परीक्षा केंद्राची यंत्रणा सज्ज असते. मात्र, यात यंदा काहीसा बदल होणार आहे.
असे असेल नियोजन
- तालुका आणि मोठ्या शहरांत परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या सरमिसळ पद्धतीने बैठक व्यवस्था करण्यात येईल.
- दोन किंवा जास्त केंद्र असलेल्या ठिकाणीच ही पद्धत असेल.
- प्रत्येक केंद्रावरची विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्थेची क्षमता लक्षात घेऊन अंमलबजावणी
- सरमिसळ केल्यामुळे विद्यार्थ्यांना दूरवरच्या केंद्रावर परीक्षेसाठी जावे लागणार नाही, याची खबदारीही घ्यावी लागणार
- विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेबाबत प्रवेशपत्रावर परीक्षा स्थळाची नोंद अचूक करावी लागणार आहे.