नगर – दुकानासमोर बॅरिकेड लावण्याच्या वादातून दोन व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवार (दि.15) रोजी शहरातील बाजारपेठ बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. कापड बाजारातील तेलीखुंट चौकात व्यापाऱ्यांनी केलेल्या ठिय्या आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी बाजारपेठेतील अतिक्रमणाचा मुद्दा उचलून धरला. जोपर्यंत अतिक्रमण काढले जात नाही, तो पर्यंत आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलनकर्ते ठाम राहिले. यावेळी आंदोलकांनी जय श्रीराम, अशा घोषणा देत हनुमान चालीसाचे गायन केले.
आमदार संग्राम जगताप, वसंत लोढा, संभाजी कदम, दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, दामोदर बठेजा, इश्वर बोरा, बंटी डापसे, हरजितसिंग वधवा, प्रकाश लोळगे, योगीराज गाडे, अभिषेक कळमकर, अजिक्य बोरकर, प्रकाश भागानगरे आदींसह कार्यकर्ते, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. या घटनेचे तीव्र पडसाद व्यापारी संघटनांमध्ये उमटले. नगर शहरातील बाजारपेठ शनिवारी बंद ठेवण्यात आली. कापड बाजारात ठिय्या देत अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
“नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी’, “हम सब एक है’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शहरातील कापडबाजार, तेलीखुंटसह बाजारपेठेतील दुकाने बंद होती. दरम्यान, या घटनेत जखमी झालेले दीपक रमेश नवलानी (रा. सावेडी, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपींविरूद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील अमर हमीद शेख व रिजवान अमिन सय्यद (रा. पाच लिंब गल्ली, कापड बाजार) यांना अटक करण्यात आली. हमजा शौकत आली शेख व त्याचा धाकटा भाऊ (रा. मोची गल्ली, नगर) हे फरारी आहेत.
शुक्रवारी 14 एप्रिलच्या सायंकाळी कापड बाजारात ही घटना घडली. मिरवणुकीसाठी शहरातून वाहतुकीचे नियमन करण्यासाठी बॅरिकेडस लावण्यावरून हा वाद झाला. यावरून आरोपींनी धारदार शस्त्राने नवलानी यांच्या छातीवर आणि पोटावर वार केले. प्रवीण बोगावत यांच्यावरही वार केले. जखमींवर उपचार सुरू आहेत.
अवैध व्यवसाय दहा दिवसात बंद!
व्यापाऱ्यांवर सुरू असलेले हल्ले खोरांचा तातडीने बंदोबस्त केला जाईल. तसेच नगर शहरातील अवैध व्यवसाय मटके, बिंगो, जुगार इ. व्यवसाय येत्या दहा दिवसात तातडीने बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देणार आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने हलगर्जीपणा केल्यास कारवाई केली जाईल. त्यामुळे नगर शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे खा. विखे यांनी म्हटले आहे.