पवनानगर – दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, आंबा व इतर फळांची उन्हाळ्यात आवक होत असते. मात्र, यावर्षी सर्वसामान्यांना या फळांची गोडी चाखायला मिळणार की नाही? अशी अवस्था निर्माण झाली आहे. वातावरणातील लहरीपणाचा फटका आता पिकांना बसू लागला आहे. आंब्याचा मोहर गळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मोहोर फुटण्यास सुरुवात होते. परंतु फेब्रुवारी महिना संपत आला तरी अजून काही आंब्यांना मोहोर आला नाही. मावळ तालुक्यात सद्य:स्थितीत मावळातील शेतकरी आंब्याची शेती करू लागले आहेत. मुंबई, पुणे अशा मोठ्या बाजारपेठा जवळ असल्याने शेतकऱ्यांना आंबा पिकातून मोठे आर्थिक उत्पन्न मिळत आहे. परंतु यावर्षी हवामानात सातत्याने बदल होत असल्यामुळे त्याचा परिणाम पिकांवर झाल्याचे दिसून येत आहे. उशिरा आलेल्या थंडीमुळे व धुक्यामुळे आंब्याची अनेक झाडे मोहरली परंतु तीही कमी प्रमाणात. काही झाडांना थोडाफार आलेला मोहर अतिथंडीमुळे व ढगाळ वातावरणामुळे गळून गेला.
उत्पादन घटण्याची शक्यता
हवामानातील बदलांमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पूर्वी ग्रामीण भागात गावाच्या आजूबाजूला आमराई असायची त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आंब्याची किंमत वाटायची नाही. परंतु कालांतराने वृक्षतोड माफियाकडून या फळांच्या झाडाची कत्तल झाली. त्यामुळे ही आमराई नामशेष झाली आहे. आता मोजक्याच शेतकऱ्यांकडे आंब्याची झाडे आहेत. गेल्या वर्षी झाडांना मोहोर दिसत होता, त्यामुळे उत्पन्न चांगले मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र यंदा वातावरणाच्या लहरी पणाचा फटका आंब्याच्या मोहोराला बसणार, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे आंबा पिकाचा मोहोर गळू लागला आहे. आंबा पिकाची कशी काळजी घ्यावी याविषयी आपण शेतीशाळेच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. त्यामध्ये आपल्याकडे आंब्याची शेती शाळा चालू असून, हॉर्टसॅप प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामधून नियमित सर्वेक्षण करत आहोत. हॉर्टसॅपच्या माध्यमातून आपण आंबा पिकाचे नियमितपणे सर्वेक्षण करून कीड व रोगांबाबत काय काळजी घ्यावी या विषयी शेतकऱ्यांना वेळोवळी मार्गदर्शन करत आहोत.
– दत्तात्रय पडवळ, तालुका कृषी अधिकारी, मावळ.