पाणी वाढल्यास पुन्हा वाहतूक ठप्प होण्याची शक्यता
कराड – पुणे-बेंगलोर महामार्गावर वाठार, ता. कराड येथे दक्षिण मांड नदीला कृष्णा नदीतील पुराच्या पाण्याची फूग आल्याने पुराचे पाणी महामार्गावर आले होते. त्यामुळे मंगळवारी रात्री महामार्गावरील कराड-कोल्हापूर दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र, कृष्णा, कोयना नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर थोडासा कमी झाल्याने कराड येथील पूरपरिस्थती काही प्रमाणात ओसरली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपासून महामार्गावरील पश्चिमेकडील एकाच लेनवरून कराड-कोल्हापूर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वाठार, ता. कराड येथे कृष्णा नदीतील पुराच्या पाण्याची दक्षिण मांड नदीला मोठी फूग लागली. त्यामुळे कृष्णा नदीतील पुराचे पाणी उलटे दक्षिण मांड नदीकडे चढल्याने महामार्गावर मांड नदीवरील पुलाच्या दक्षिणेकडील बाजूस असलेल्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचले होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे रोखून धरला होता. त्यामुळे महामार्गावर वाठार ते कराड दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
मात्र, बुधवारी 6 रोजीपासून कराड, पाटणसह कोयना, नवजा, महाबळेश्वर परिसरातही पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे. शिवाय कर्नाटक येथील अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने कराड, सांगली, कोल्हापूर येथील पूरपरिस्थिती काहीशी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाठार येथे महामार्गाच्या पश्चिम बाजूच्या लेंथवरील पुराचे पाणीही काही प्रमाणात ओसरले आहे.
मात्र, पूर्वेच्या लेनवर अजूनही मोठया प्रमाणात पुराचे पाणी असल्यामुळे ही लेंन वाहतुकीस पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तसेच पश्चिम बाजूच्या एकाच लेनवरून एकाच लेनवरून कराड-कोल्हापूर अशी दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. परंतु, हवामान खात्याकडून आणखी तीन दिवस कोकण किनारपट्टीसह सातारा, कराड, सांगली कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
त्यामुळे कृष्णा, कोयना नद्यांच्या पाणलोट क्षेत्रासह धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा पूरपरिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाठार येथे परत महार्गावर पाणी आल्यास महामार्ग पुन्हा एकदा वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. मंगळवारी रात्री वाठार, ता. कराड येथे महामार्गावर पुराच्या पाण्याची आल्याने महामार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र, अजूनही पूर्वेच्या लेनवर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साचल्यामुळे ही लेन वाहतुकीस पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून पाचवड ते वाठार दरम्यान ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अपुरे साहित्य, पैसे यामुळे ट्रक चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.