-योगेश मिश्र, राजकीय विश्लेषक
गांधीजींचे मोठेपण त्यांचे आचरण, सिद्धांत आणि सत्यव्रत यात आहे. ज्याचा अभ्यास आणि आचरण आपल्या जीवनात केला नाही, अशा एकाही गोष्टीचा त्यांनी प्रचार केला नाही. गांधीजी अखेरच्या श्वासापर्यंत सत्याचरण करीत राहिले.
बापूजींच्या चष्म्याचा लिलाव झाला तेव्हा एका अमेरिकी कलेक्टरने तो 2.55 कोटी रुपयांना विकत घेतला. ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन कंपनी या लिलाव करणाऱ्या कंपनीला या चष्म्याच्या मोबदल्यात 14 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम येणार नाही, अशी अपेक्षा होती. हा चष्मा गांधीजींच्या काकांनी दक्षिण आफ्रिकेत प्रवासादरम्यान त्यांना दिला होता. गांधीजींच्या बाबतीत शेलक्या शब्दांत टीका करणाऱ्यांचे म्हणणे तर्कशुद्ध असते, तर गांधीजींच्या नावाने जगात सर्वाधिक पुस्तके लिहिली जाण्याचा विक्रम झाला असता का? सर्वाधिक बायोपिक त्यांच्यावर तयार होण्याचा विक्रम झाला असता का? यापूर्वी गांधीजींच्या 3 ऑक्टोबर 1933 रोजीच्या पत्राचा लिलाव झाला होता. या पत्रात त्यांनी कॅथॉलिक ख्रिश्चन आणि जगभरातील धर्मांची चर्चा केली आहे.
या पत्राचा लिलाव 15 हजार 860 डॉलर्सना झाला होता. गांधीजींच्या रक्ताचा तपासणी अहवाल 10 हजार 370 डॉलर्सला लिलावात विकला गेला होता. यावर दिल्लीच्या आयर्विन हॉस्पिटलमधील पॅथॉलॉजी विभागाचे संचालक बी. एल. तनेजा यांची स्वाक्षरी आहे. गांधीजींच्या 60 छायाचित्रांचाही लिलाव झाला होता आणि त्यातून 4 हजार 880 डॉलर्स एवढी रक्कम मिळाली होती. या छायाचित्रांत कॉंग्रेस नेत्यांसमवेत इंग्लंडमध्ये गांधीजी दिसत आहेत. अनेक जागतिक नेतेही त्यांच्यासमवेत आहेत.
गांधीजींवर एकूण दहा चित्रपट तयार झाले. पहिला चित्रपट होता “महात्मा गांधी ः ट्वेन्टिएथ सेंच्युरी प्रोफेट’. 1953 मध्ये प्रदर्शित झालेली ही अमेरिकन डॉक्युमेन्टरी फिल्म होती आणि स्टॅनले नील यांनी ती दिग्दर्शित केली होती. दुसरा ब्रिटिश चित्रपट 1963 मध्ये तयार झाला. “नाइन अवर्स ट्रू ड्रामा’ नावाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मार्क रोब्सन यांनी केले होते. या चित्रपटात गांधीजींच्या हत्येपूर्वी नथुराम गोडसे याच्या आयुष्यातील नऊ तासांचे वर्णन आहे. या चित्रपटात केवळ ब्रिटिश, जर्मन आणि अमेरिकन कलाकार होते. या चित्रपटाने दहा लाख डॉलर्सची कमाई केली होती. तिसरा चित्रपट 1968 मध्ये “महात्मा ः लाइफ ऑफ गांधी’ या नावाने प्रदर्शित झाला. हाही एक माहितीपट होता आणि विठ्ठलभाई झवेरी यांनी तो दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाची इंग्रजी आवृत्ती पाच तासांची तर हिंदी आवृत्ती 2 तास 20 मिनिटांची होती.
1982 मध्ये गांधीजींवरील चौथा चित्रपट प्रदर्शित झाला. रिचर्ड ऍटनबरो यांनी दिग्दर्शित केलेला “गांधी’ नावाचा हा चित्रपट बेन किंग्जले यांनी वठविलेल्या गांधीजींच्या भूमिकेमुळे जगभर गाजला. 22 दशलक्ष डॉलर्स खर्च करून तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने 127.80 दशलक्ष डॉलर्सची विक्रमी कमाई केली होती. बेन किंग्जले यांनी म्हटले होते की, “या चित्रपटासाठी संशोधन करताना आपल्याला गांधीजी आणि त्यांच्या विचारांचे दर्शन घडले. आपल्या जीवनावर त्या विचारांनी खोलवर परिणाम केला.’ “गांधी ः हिज लाइफ अँड मेसेज फॉर द वर्ल्ड’ या लुईस फिशर यांच्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित होता.
गांधीजींवरील पाचवा चित्रपट 1996 मध्ये तयार झाला. तो “मेकिंग ऑफ महात्मा’ या नावाने. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सहकार्यातून हा चित्रपट तयार झाला होता आणि त्याचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले होते. या चित्रपटात गांधीजींनी आफ्रिकेत व्यतीत केलेल्या 21 वर्षांचे दर्शन घडते. 2000 मध्ये गांधीजींवरील सहावा चित्रपट “हे राम’ या नावाने प्रदर्शित झाला आणि त्याचे दिग्दर्शन कमल हासन यांनी केले होते. भारताची फाळणी आणि गांधीजींची हत्या यावर हा चित्रपट आधारित आहे. 6 कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने सुमारे 11.5 कोटी रुपयांची कमाई केली. “गांधी माय फादर’ या नावाने फिरोज अब्बास खान यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला. तो गांधीजींवरील सातवा चित्रपट होय. गांधीजी आणि त्यांचा पुत्र हिरालाल यांच्यातील नात्यांचे दर्शन या चित्रपटात होते.
हिरालालची भूमिका अक्षय खन्नाने साकारली होती. त्यानंतर चार वर्षांनी, 2011 मध्ये “गांधी टू हिटलर’ या नावाने एक चित्रपट राकेश रंजन कुमार यांनी दिग्दर्शित केला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान गांधीजींनी हिटलरला लिहिलेल्या पत्रांवर हा चित्रपट आधारित होता. अविजित दास यांनी या चित्रपटात गांधीजींची भूमिका साकारली होती. 2012 मध्ये “वेलकम बॅक गांधी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ए. बालाकृष्णन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात ए. कनागराज यांनी गांधीजींची भूमिका साकारली होती. ही एक फॅण्टसी असून मृत्यूनंतर 60 वर्षांनी गांधीजी परत आल्याचे चित्रपटात दर्शविण्यात आले आहे.
गांधीजींवर छोटी-मोठी सुमारे 3 हजार पुस्तके जवळजवळ सर्व भाषांमध्ये लिहिली गेली आहेत. गांधी समग्र साहित्य हेच मुळात 100 पेक्षा अधिक खंडांचे आहे. गांधीजींच्या सन्मानार्थ शंभराहून अधिक देशांनी टपाल तिकिटे जारी केली आहेत. गांधीजींच्या सन्मानार्थ पोस्टकार्ड जारी करणारा पोलंड हा पहिला देश होता. संयुक्त राष्ट्रांनी 2 ऑक्टोबर 2009 मध्ये गांधीजींच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले. महात्मा गांधींचे पुतळे केवळ भारतातच नव्हे तर 70 पेक्षा अधिक देशांमध्ये आहेत.
1893 मध्ये भारतीय कंपनीच्या वतीने खटला लढविण्यासाठी गांधीजी आफ्रिकेत गेले. 1894 मध्ये वर्णभेदाचा सामना त्यांना करावा लागला. तिथेच राहून समाजकार्य आणि वकिली करण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला. 21 वर्षे ते दक्षिण आफ्रिकेत राहिले. सत्याग्रह हे त्यांच्या विचारांचे मूळ आहे. आफ्रिकी सरकारच्या काळ्या कायद्याला त्यांनी अहिंसेच्या मार्गाने आणि दृढतेने विरोध केला. सविनय कायदेभंग आणि सत्याग्रह या मार्गांनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद त्यांनी संपुष्टात आणला.
जगातील सर्वांत महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या घरात महान मानवतावादी अल्बर्ट श्वाइट्झर आणि महात्मा गांधी यांच्या तसविरी टांगलेल्या दिसत. आइन्स्टाइन यांनी त्याकाळी म्हटले होते की, “यशाचे फोटो भिंतीवर लावण्याऐवजी सेवाव्रताचे फोटो लावण्याची वेळ आता आली आहे.’ आइन्स्टाइन आणि गांधीजी एकमेकांना कधीच भेटले नाहीत; पण आइन्स्टाइन यांनी 27 सप्टेंबर 1931 रोजी वेल्लालोर अण्णास्वामी सुंदरम यांच्याकडून गांधीजींसाठी एक पत्र पाठविले होते.
त्यात लिहिले होते, “आपल्या कृतीतून आपण असे दाखवून दिले आहे की, आपण आपले आदर्श जग हिंसेचा आधार न घेता साकारू शकतो. हिंसावादाच्या समर्थकांनाही आपण अहिंसेने जिंकू शकतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाने समाजाला प्रेरणा मिळेल. भक्ती आणि आदरयुक्त या उल्लेखासह मी अपेक्षा करतो की, मला एकदा तरी आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल.’