राजगुरूनगर – चास कमान धरणाच्या डाव्या कालव्याला निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे रविवारी (दि. 22) दुपारीभगदाड पडल्याने कालवा फुटला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. चासकमान धरणाचा डावा कालवा फुटण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. कालवा फुटल्याने कालव्याखाली असलेल्या शेतातील पिकांचे नुकसान झाले.निमगाव खंडोबा व दावडी कडे जाणाऱ्या व राजगुरूनगरकडे येणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असल्याने पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली.
शिरूर तालुक्याला वरदान असलेल्या चास कमान धरणातून सुमारे 500 क्युसेक वेगाने पाणी डाव्या कालव्यातून सोडले जात आहे. धरणाचा डावा कालवा निमगाव दावडी या परिसरातून पुढे शिरूर तालुक्यात जातो. रविवारी (दि 21) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास निमगाव खंडोबा येथे अचानक डावा कालवा फुटला. कालवा फुटल्यामुळे कालव्यातील पाणी शेतात शिरले. शेतातील पिके वाहून ओढ्याला मोठा पूर आला आहे.
निमगावचे माजी सरपंच अमर शिंदे पाटील, दशरथ शिंदे यांनी धरण व्यवस्थापनाकडे संपर्क साधून या घटनेची कल्पना दिली. धरण व्यवस्थापनाने धरणातून डाव्या कालव्याला सोडण्यात आलेले पाणी बंद केले. कालव्या फुटल्यामुळे निमगाव येथे कारभारी वस्ती येथील दावडी-निमगाव रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे सुमारे चार तास दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. धरण विभागाचे आधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
शेतकऱ्यांकडून छेडछाड
शेतीला पाणी मिळावे यासाठी कालव्या शेजारील शेतकरी कालव्याशी छेडछाड करीत असतात त्यामुळे कालव्यातून मोठी गळती होत आहे. चास कमान धरणाचा डावा कालवा महिनाभरात दोन वेळा फुटला आहे. यावरून कालव्याची डागडुजी होण्यापेक्षा त्याची नव्याने दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
तरी प्रशासनाचा काणाडोळा
चास कमान धरणाचा डावा कालवा नादुरुस्त बनत चालला आहे. धरणाच्या डाव्या कालव्याची गळती होत असलेल्या ठिकाणी वरवरची डागडुजी केली जाते. या कालव्याला अनेक ठिकाणी गळती आहे; मात्र शासन व धरण प्रशासन याकडे काणाडोळा करतात. गळती होते त्या ठिकाणी केवळ पाहणी केली जाते तर शासनाकडून कालव्याच्या दुरुस्तीला भरीव निधी मिळत नाही, त्यामुळे कालव्याची स्थिती काही ठिकाणी फुटण्यायोग्य झाली आहे.