लाखणगाव – सध्या वातावरणात उन्हाचा कडाका वाढू लागला असून, आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेती पिके यामुळे सुकत असून त्यांना पाण्याची गरज आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने या परिसरातील जमिनीतील पाणी पातळी कमी असल्याने डिंभा धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. सरकारने अनेक तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत. आंबेगाव तालुक्यातही तीच परिस्थिती असून, सध्या शेतात असलेल्या शेती पिकांना पाण्याची गरज आहे. जमिनीची पाणी पातळी कमी असल्याने विहिरी, ओढ्या-नाल्यांना पाणी कमी आहे.
15 डिसेंबरनंतरचे नियोजन
पूर्व भागात व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागाला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. येथील शेती डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यामुळे बागायती झाली आहे. मात्र,सध्या शेतामध्ये उभ्या असणाऱ्या पिकांना सध्या पाण्याची गरज असून, पाणी सोडण्याची मागणी वाढली आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने 15 डिसेंबर नंतर पाण्याचे आवर्तन सोडण्याचे नियोजन झाले आहे; परंतु नोव्हेंबर महिन्यातच शेती पिके सुकू लागल्याने हे आवर्तन लवकर सोडावे, अशी मागणी अनिल वाळुंज यांनी केली आहे.