खंडाळा,(प्रतिनिधी) – खंडाळा-असवली रस्त्यावरून जाणार्या धोम-बलकवडी कालव्यात रविवारी (दि. 11) दुपारी अजनुज येथील विक्रम पवार (वय 32) व शंभूराज (वय 5) हे पिता-पुत्र वाहून गेले होते. या दुर्घटनेत शंभूराजचा मृत्यू झाला. कालव्यात बेपत्ता झालेल्या विक्रम पवार यांचा मृतदेह तब्बल 20 तासांच्या शोधमोहिमेनंतर अजनुज-अंबरवाडी हद्दीत आढळला.
याबाबत माहिती अशी, विक्रम पवार व शंभूराज हे काल (दि. 11) कालव्यात वाहून गेल्यानंतर, युद्धपातळीवर शोधमोहीम राबवण्यात आली. शंभूराज रविवारी सायंकाळी कालव्यात सापडला. त्याला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले होते. या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या विक्रम यांचा शोध सुरू होता.
कालव्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तहसीलदार अजित पाटील यांनी पाणी तात्काळ बंद करण्याची सूचना धरण व्यवस्थापनला केली होती. दरम्यान, शोधमोहीम सुरू असताना एका स्थानिक नागरिकाला कालव्याच्या तळाला मृतदेह अडकल्याची शंका आली. त्यानुसार खंडाळा व शिरवळ रेस्क्यू टीम आणि स्थानिक तरुणांनी शोध घेतल्यावर विक्रम यांचा मृतदेह सापडला. नागरिकांनी दोरीच्या साह्याने पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही माहिती मिळताच खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, मृतदेह रुग्णवाहिकेतून खंडाळा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. अजनुज स्मशानभूमीत पिता-पुत्रावर मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नियतीचा घाला
गोधडी धुवायला गेलेले पवार कुटुंबीय कालव्यावर गर्दी असल्याने परत आले होते. मात्र, थोड्या वेळाने गर्दी कमी झाल्याचे कळाल्याने, ते पुन्हा तेथे गेले आणि पवार पिता-पुत्रावर नियतीने घाला घातला.