नवी दिल्ली – हरिद्वार येथे झालेल्या धर्म संसदेत अल्पसंख्यांकांविरोधात द्वेष पसरवणाऱ्या भाषणांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनीही जोरदार टीका केली आहे. जे कोणी चिथावणीखोर आणि प्रक्षोभक भाषणे करतात, त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. यामध्ये कोणताही अपवाद असता कामा नये, असे मत संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले आहे.
द्वेषाचे राजकारण म्हणजे भ्रष्टाचार आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अशाप्रकारे द्वेष जोपासू नये. समाजातील एका गटाला दुसऱ्याविरोधात भडकावू नये, असे इंद्रेश कुमार यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
एखाद्या समाजाच्याविरोधात विभाजनवादी आणि चिथावणीखोर वक्तव्ये करण्याऐवजी देशहितासाठी बंधुत्वाचे आणि विकासाचे राजकारण करावे. असे इंद्रेश कुमार यांनी सांगितले.
सर्व प्रकारची द्वेष वक्तव्ये ही पूर्णपणे निषेधार्हच आहेत. कायद्यानुसार त्यांचा निषेधच व्हायला पाहिजे. त्यासंदर्भात कोणीही अपवाद असता कामा नये. अशा द्वेष पसरवणाऱ्या वक्तव्यांमुळे देशातील वातावरण दूषित होत असल्यामुळे त्यावर कायद्यानेच निर्बंध आणले जायला पाहिजेत, असे त्यांनी जोर देऊन सांगितले.