पालेकेल्ले – कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाला आज श्रीलंका महिला संघाविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात निर्विवाद वर्चस्वाची संधी आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने जिंकत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला होता. दुसरा सामना तर 10 गडी राखून जिंकत विजयी आघाडी घेतली होती. मात्र, तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत जे झाले ते एकदिवसीय मालिकेत होऊ नये यासाठी भारतीय संघाला आपल्या याच खेळात सातत्य दाखवावे लागणार आहे. टी-20 सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने जिंकत मालिकाही खिशात टाकली होती. मात्र, अखेरच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे निर्विवाद वर्चस्व मिळवता आले नाही. ही चूक एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत करून चालणार नाही.
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताच्या सलामीवीरांसाठी महत्त्वाचा होता व त्यांनीही या संधीचे सोने केले. स्टार फलंदाज स्मृती मानधना व शफाली वर्मा यांनी एकही गडी न गमावता हा सामना जिंकून दिला. या दोघींकडून अशाच खेळीची अपेक्षा होती व ती त्यांनी पूर्ण केली. मानधना तर गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने अपयशी ठरत होती, तिलाही तिच्या नाबाद 94 धावांच्या खेळीने आत्मविश्वास मिळाला.
रेणुका सिंग, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, दीप्ती शर्मा यांनाही गोलंदाजीत पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे सातत्य राखावे लागणार आहे. श्रीलंका संघाबाबत बोलायचे झाले तर चामरी अटापट्टूचे नेतृत्व चांगले असले तरीही खेळाडूंकडून सांघिक कामगिरी झालेली नाही, त्यामुळेच त्यांना या दोन्ही मालिका गमवाव्या लागल्या आहेत. आता किमान तिसरा सामना जिंकत मायदेशात प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांना भारतीय संघापेक्षाही जास्त सरस कामगिरी करावी लागेल.