पुण्यापासून 50 कि.मी. अंतरावर आमचे गाव आहे. जेजुरीच्या नजीक कऱ्हा नदीच्या काठावर ते वसले आहे. बेलसर त्याचे नाव आहे. अधून मधून मी गावी जात असतो. गावाच्या लगतच डांबरी रस्त्याच्या कडेला आम्ही दोन खोल्यांचे घर बांधले आहे. खरं म्हणजे ते फार्म हाऊसच आहे. आठ गुंठे जागेवर ते बांधले आहे. घराच्या आजूबाजूला केळी, डाळींब, पेरू, लिंबू, जांभूळ यांची झाडे आहेत. फार्म हाऊसला कंपाउंड केले आहे. शहरी जीवनाचा कंटाळा आला की शबनममध्ये माझे कपडे, दोन पुस्तकं घेऊन मी गाव गाठतो. संध्याकाळचे जेवण झाले की घरापुढे बसतो. सर्वत्र नीरव शांतता असते. समोरच्या रस्त्यावरून एखादे वाहन जात असते. उत्तरोत्तर रात्र वाढत जाते आणि गाड्यांची ये जा थांबते. झाडं शांतपणे उभी असतात. आकाशात चांदण्या लुकलुकत असतात. सर्वत्र चांदणे पसरले असते. झाडांच्या सावल्या त्या चांदण्या रात्री रांगोळी घातल्यासारख्या दिसत असतात. हवेत मंद गारवा असतो. झाडांनी मौन धारण केलेले असते. शेजारच्या प्रचंड मोठ्या वडाच्या झाडावर राघू विसावलेले असतात. तो एकांत कितीतरी सुखकारक वाटतो. माणसाला जसा लोकांत हवा असतो तसा एकांतही हवा असतो. त्या शांततेतून मी ऊर्जा मिळवत असतो.
माझे मन मला म्हणते “तू आता कशाला शहरी जीवनाचा हव्यास धरतोस? तुझी आता पासष्टी झाली आहे. उतर आयुष्य याच खेड्यात घालव.’ तर दुसरे मन म्हणते गीतेतला “कर्मयोग’ आठव. कामात राम शोध. थांबला तो संपला. कर्म करीत रहा. चरैवती, चरैवती हा तुझा जीवनधर्म असला पाहिजे. तिकडे पुण्यात जाऊन लेखन करायचंय, मुलांना गोष्टी सांगायच्यात, गांधी, विनोबा, साने गुरुजींवर बोलायचंय, मराठी बालकुमार साहित्य संस्थेचं काम करायचंय, “शिक्षण संक्रमण’ या अंकाचं संपादनाचं काम करायचंय. ही सर्व काम मी अंगावर घेतल्यामुळे मला पुण्याला यावे लागते.
गावी गेल्यामुळे मला गावची खबरबात कळते. काही वर्षांपूर्वी समजले की गावातले दीड दोनशे लोक सहलीला गेलेत. एका तालुक्याच्या पुढाऱ्याने त्याच्या खर्चाने ही सहल आयोजित केली आहे. आठ दिवसांच्या या दौऱ्यात लोक आग्रा, दिल्ली, हरिद्वार, ऋषीकेश, अयोध्या हे सर्व पाहणार आहेत. या सहलीत जसे पुरुष आहेत तशा महिलाही आहेत. एक पै खर्च न होता सहलीचा आनंद घेता येणार आहे. हा सर्व खर्च तो पुढारी करतो कारण भविष्यात हे लोक मला मतदान करतील असा त्याचा आशावाद असतो. पण आपण लोकशाही व्यवस्था भ्रष्ट करीत आहोत याचे त्याला देणे घेणे नसते आणि सहलीत भाग घेणारे लाभार्थी म्हणतात, पुढचे पुढे बघू. आज तर सर्व पाहून झाले ना? नाहीतर एवढ्या लांब कशाला आपण स्वखर्चाने आलो असतो?
असा हा सर्व भ्रष्ट व्यवहार आहे. मागे एकदा मी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस गावी गेलो होतो. तर घराजवळच्याच मंगल कार्यालयात महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाची गावात दवंडी दिली नव्हती. कुठे फळ्यावर लिहून ठेवले नव्हते. कुठे चावडीवर नोटीस लावली नव्हती. कार्यकर्त्यांमार्फत कर्णोपकर्णी निरोप दिला जातो. तो सर्व वाड्या-वस्त्यांवर व्यवस्थित पोहोचता होतो आणि शेतात रोजगारावर जाणाऱ्या महिला कामावर न जाता कार्यक्रमस्थळी हजर राहतात.
या कार्यक्रमाचे दाते पुढारी यांची तब्बेत अचानक बिघडली. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. निदान एवढे सलाईन लावून मगच जा असा आग्रह केला. त्यामुळे त्यांना कार्यक्रमाला यायला दोन तास उशीर झाला. तसा त्यांचा फोन प्रमुख आयोजक कार्यकर्त्यांना आला. आता काय करावे? इकडे महिला तर मंगल कार्यालयात उत्साहाने येऊन बसल्यात. त्यांना दोन तास थोपवून कसे धरावे? मग तालुका अध्यक्षांना मी बरोबर सापडलो. मी बोलणारा शिक्षकी पेशातला माणूस. मला संयोजकांनी विनंती केली आणि महिलांसमोर बोलण्यास सांगितले. मी साने गुरुजींच्या श्यामच्या आईतले काही प्रसंग कथन केले. श्यामच्या आईने श्यामला कसे वाढवले, घडवले आणि संस्कारित केले ते पोटतिडकीने सांगितले. संयोजकांची वेळ मी निभावून नेली. पण मला प्रश्न पडतो, किती महिलांनी माझे व्याख्यान ऐकून घेतले असेल? कुणाला ते आवडले असेल? जेव्हा देणारा आणि घेणारा भ्रष्ट व्यवहार करीत असतो तेव्हा तेथे संस्कार फिका पडतो.
यावेळच्या निवडणुकीआधीही मी गावी गेलो होते. गावात रिक्षातून प्रचार सुरू होता. संध्याकाळी सर्वांना नदीपलीकडे जेवण होते. उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी ते घडवून आणले होते. अर्थात सर्व खर्च उमेदवाराचाच होता. या जेवणात शाकाहारी व मांसाहारी अशी दोन्ही प्रकारची सोय होती. विशेष म्हणजे रात्र असूनही महिला जेवायला आल्या होत्या. मला निरोप मिळाला पण मी गेलो नाही. माझा भाऊ, त्याच्या मित्राबरोबर गेला होता. परत आल्यावर त्याने सांगितले, “लोक जेवणावर तुटून पडत होते. शाकाहारापेक्षा मांसाहारावर ताव मारत होते. तरुण मुले अगोदरच दारू पिऊन आली होती. ती भेलकांडत होती. काहींनी खिशात दारूच्या बाटल्या आणल्या होत्या. नशा चढल्यामुळे काहीजण तावातावाने बोलत होते. गप्पांना बहर चढला होता. हे सर्व ऐकून आणि पाहून मला प्रश्न पडतो, सामान्य परिस्थितीतील नागरिक किंवा कार्यकर्ता हा निवडणूक लढवू शकेल काय? तो या असल्या मनी, मसलच्या स्पर्धेत टिकेल काय? ही खरी लोकशाही आहे काय? राजीव गांधींनी 18 वर्षांवरील तरुणांना मतांचा अधिकार दिला आहे; पण या असल्या वातावरणात लाभार्थी झालेले भ्रष्ट मतदार सद्सद्विवेक बुद्धीनुसार मतदान करतील काय? मग असल्या वातावरणात निवडून आलेले प्रतिनिधी हे खरोखरच जनतेचे प्रतिनिधी आहेत काय? हे सर्व शहरात, गावागावात उघडपणे चालले आहे; पण त्याविरुद्ध कोणी आवाज उठवत नाही. त्यासाठी सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून या भ्रष्ट व्यवहारांविरुद्ध आवाज उठवावा लागेल. लोकशाहीला लागलेली ही कीड थांबवावी लागेल. त्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागेल आणि सुरुवात स्वतःपासून करावी लागेल.
– डॉ. दिलीप गरूड