लग्न होऊन सासरच्या घरात स्त्री प्रवेश करते, तेव्हा घरची लक्ष्मी म्हणून तिचा गौरव होतो. लक्ष्मीची पावले उमटवली जातात. पहिली बेटी, धनाची पेटी असं म्हटलं जातं. संपत्तीची देवता म्हणून लक्ष्मीचे पूजन केले जाते. प्रत्यक्षात किती स्त्रियांच्या हातून पैशांचे व्यवहार होतात? कितीजणींना आर्थिक स्वातंत्र्य आहे? नोकरी करीत असलेल्या किती बायकांचा आपल्या मिळकतीवर हक्क असतो? शिक्षणाचे प्रमाण एवढे वाढल्यानंतरसुद्धा आर्थिक संस्थांमधे उच्च पदावर किती स्त्रिया दिसतात?
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे जगातील सर्व देशांतील स्त्री-पुरुषांमधील जी विषमता आहे, तिचे मोजमाप करणारा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालात प्रत्येक देशातील स्त्रिया आणि पुरुष यांच्यामधे जी आर्थिक दरी निर्माण झाली आहे, त्याची गुणानुक्रमे यादी केली जाते. या अहवालात 135 देशांची यादी दिली आहे. स्त्री-पुरुषांमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील तफावत सगळ्यात कमी असेल तो देश पहिल्या क्रमांकावर आणि ही विषमता सगळ्यात जास्त असेल तो शेवटच्या क्रमांकावर अशी ही क्रमवारी आहे. आपला देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहतो आहे. पण या यादीत स्त्री आणि पुरुष यांच्या आर्थिक तफावतीच्या बाबतीत भारताचा क्रमांक 123वा आहे.
भारतातल्या स्त्रिया अत्यंत कष्टाळू व बुद्धिमान आहेत पण भारतीय पुरुष त्यांच्या हाती पैसा लागू देत नाहीत. कारण अर्थकारण आणि सत्ताकारण या दोन गोष्टी हातात हात घालून चालत असतात. आर्थिक निर्णय पुरुषांनीच घ्यायचे, सर्व व्यवहाराच्या आर्थिक नाड्या स्वतःच्या हाती ठेवायच्या आणि त्यायोगे आपलाच अंमल सर्वत्र राहील अशी काळजी घ्यायची; असे धोरण कुटुंबातही दिसते आणि समाजातही दिसते. पण वैयक्तिक द्वेषापोटी आपण समाजाचे आणि राष्ट्राचेही केवढे नुकसान करीत आहोत हे पुरुषांच्या लक्षात येत नाहीय किंवा लक्षात आले तरी स्वार्थापोटी तिकडे दुर्लक्ष केले जाते आहे.
कोणत्याही देशाचे मनुष्यबळ किती आहे, असा विचार केला जातो, तेव्हा सर्व स्त्रिया आणि सर्व पुरुष त्यात मोजले जातात. पण भारतामधे अनुत्पादक गोष्टींसाठीच बायकांना राबवले जाते. देशाची आर्थिक सुबत्ता वाढवण्याच्या दृष्टीने त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा, कर्तृत्वाचा उपयोग नीटपणे करून घेतला जात नाही. त्यामुळे आर्थिक उत्पन्नाची सरासरी काढली असता ती पन्नाससाठ टक्क्यांची उत्पादकता शंभर टक्क्यांमधे विभागली जाते. राष्ट्रीय उत्पन्नात स्त्रियांना सहभागी करून घेत नसल्याची मोठी किंमत भारताला मोजावी लागत आहे.
आपण फार सहजपणे म्हणतो, आजकाल कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे. स्त्रियांना नोकरी मिळवणं सोपं जातं. प्रत्यक्षात अगदी उलट परिस्थिती आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी खासगी कंपन्यांनी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. तसेच सरकारनेही स्वतंत्र उद्योगधंदे उभे राहण्यासाठी प्रोत्साहन द्यावे म्हणून काही सोयीसवलती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पण या व्यावसायिक संधींपैकी फक्त एक टक्का संधी स्त्रियांना मिळत असल्याची नोंद आहे. असे का होते? कारण स्त्रीला कुटुंबाकडून, समाजाकडून त्या संधीपर्यंत पोहचू दिले जात नाही. तिच्या मनात तशी महत्त्वाकांक्षा निर्माण होऊ नये, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात.
1898 साली चार्लोट गिलमन हिने एका आर्थिक अभ्यासात असं लिहिलं की, स्त्री ही पुरुषापेक्षा शारीरिक व बौद्धिकदृष्ट्या अधिक सक्षम असते. खूप दीर्घकाळ ती कष्ट उपसू शकते. शांतपणे योग्य ते निर्णय घेऊ शकते. पण घर चालवण्याची जबाबदारी तिच्यावर आल्यामुळे महिलांचा अर्थकारणातला वाटा कमी कमी होत गेला आणि फक्त पुरुषाच्याच आर्थिक क्षमतेचा विचार देशाच्या आर्थिक उत्पन्नात होऊ लागला.
आपली प्रगती व्हावी, देश प्रगतीपथावर यावा, आपल्या समाजाचा आर्थिक स्तर उंचावलेला असावा, असं जर आपल्याला खरोखरच वाटत असेल तर आपली निम्मी लोकसंख्या लुळीपांगळी करून ठेवून आपण स्वतःचेच नुकसान करून घेत आहोत. स्त्रियांचा अर्थक्षेत्रातील सहभाग वाढवण्यासाठी व त्यांच्यातील सुप्तगुणांचा आर्थिक वाढीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने उपयोग करून घेण्यासाठी शासनाच्या बरोबरीने उद्योगांनीही पावले उचलणे आवश्यक आहे. तसेच घरातूनही तिला तशी मोकळीक व प्रोत्साहन मिळायला हवे.
गेल्या काही वर्षांपासून वित्त क्षेत्रात महिलांना सर्वोच्च स्थानी ठेवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यातही आशेची गोष्ट म्हणजे इंडियन मार्केट रिसर्च ब्युरोच्या सर्वेक्षणानुसार 2000 ते 2010 या दशकात शहरातील आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्त्रियांचे उत्पन्न जवळजवळ दुपटीने वाढले आहे. भारतातील सर्वात मोठ्या अशा स्टेट बॅंकेच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला विराजमान झाली. या बॅंकेच्या दोनशे सात वर्षांच्या काळात पहिल्यांदा एका स्त्रीला हा मान मिळाला. आपल्याकडे खासगी, सार्वजनिक अशा अनेक महत्त्वाच्या वित्तसंस्थांच्या प्रमुखपदी महिला आहेत. या सगळ्या गोष्टी नक्कीच आशादायक आहेत. काळ हळूहळू कूस पालटतो आहे… पालटेल अशी आशा करू यात.
घरची लक्ष्मी खरोखरच समर्थ करू या! देशाचा आर्थिक गाडा प्रगतीपथावर नेऊ या!
माधुरी तळवलकर