सातारा -सातारा ही छत्रपतींची गादी. गेल्या काही दशकांपासून राजकारण आणि सत्ताकारणामुळे छत्रपतींच्या राजघराण्यातील दोन भावांमध्ये सुरु असलेला संघर्ष काहीसा शमवण्याचे शिवधनुष्य कोणी पेलले असेल तर ते फक्त आणि फक्त दिवंगत शिवाजीराजे भोसले यांनी. त्यांच्या निधनामुळे उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील मनोमिलनाचे शिल्पकार ठरलेली “कवचकुंडले’ हरवली आहेत. आता या दोन बंधूंना आणि राजघराण्याला एकसंघ ठेवण्यासाठी शिवाजीराजे नाहीत, ही उणीव आता सतत जाणवत राहणार आहे.
‘जलमंदिर’ आणि ‘सुरुची’ असा दावा नवीन नाही. दोन पिढ्यांचा संघर्ष सातारकरांनी जवळून पाहिला आणि आजही पाहत आहेत. “जलमंदिर’ आणि ‘सुरुची’मध्ये समझोता घडवून आणला तो अदालतवाडाच आता पोरका झाला आहे. शिवाजीराजांच्या जाण्याने अदालतवाड्यातून आता राजघराण्यातील या दोन बंधूंना प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवणारे चार समजुतीचे, प्रसंगी खडे बोल आता ऐकू येणार नाहीत. अदालतवाडाच आता ‘शांत’ झाला असून पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन राजे एकमेकांना भिडत असताना या दोघांना एकमेकांच्या वैरत्वापासून परावृत्त करणार कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सातारचे राजघराणे राजकारणात 1974 मध्ये सक्रिय झाले. राजकारणाच्या रिंगणात 1990 मध्ये जलमंदिर आणि सुरुची अशी लढाई झाली. अभयसिंराजे यांचे निधन झाल्यानंतर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन चुलत बंधूंमध्ये अक्षरशः युद्धच सुरु झाल्याची परिस्थिती निर्माण झाली. सातारा पालिका असो किंवा आमदारकी, खासदारकी असो हे दोन्ही बंधू एकमेकांच्या विरोधात टोकाची भूमिका घेऊ लागले. पालिकेच्या 2006 मधील निवडणुकीत उदयनराजे यांची व शिवेंद्रराजे यांची अशा दोन्ही आघाड्या होत्या. पालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. हीच वेळ मुत्सद्दी शिवाजीराजांनी साधली.
दोन्ही पुतण्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी अदालतवाड्यातून प्रयत्न केले. शिवाजीराजेंनी दोघा भावंडांना वडिलकीचा सल्ला दिला आणि साताऱ्यात मनोमिलन झाले. मात्र, सातारा पालिकेच्या गत निवडणुकीत मनोमिलन भंगले. खा. उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीने आ. शिवेंद्रराजेंच्या नगर विकास आघाडीचा पराभव केला. आ. शिवेंद्रराजेंच्या पत्नी आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. वेदांतिकाराजे भोसले यांचाही पराभव झाला. त्यामुळे या दोन्ही भावंडांचे वैर वाढले.
या दोघांना सबुरीने घ्या, असा वडिलकीचा सल्ला देणारे, दोघांचा वाद मिटवणारे शिवाजीराजे काळाच्या पडद्याआड गेले. त्यामुळे मनोमिलनाची कवचकुंडले गळून पडली आहेत. आता मनोमिलन करा आणि राजघराणे एकसंघ ठेवा, असा लाखमोलाचा सल्ला कोण देणार, असा प्रश्न सातारकरांना सतावणार आहे.
राजधानी सातारा आणि साताऱ्याचे राजघराणं या दोन्ही गोष्टी सातारकरांसाठी अनमोल आणि अभिमानाच्या आहेत. शिवाजीराजे यांच्या जाण्याने आता या राजघराण्याला पुन्हा एकत्र आणण्यासाठी कुठली कवचकुंडले आणायची, याचे उत्तर शोधण्याची वेळ सातारकरांवर आली आहे.