प्रकाश राजेघाटगे
पुसेगाव -करोना काळात रसातळाला गेलेला शेतकरी कसाबसा सावरतोय तोपर्यंतच आले पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर खोडवा आल्याचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी गडांतर आणले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला व्यापारी अक्षरशः मातीमोल भावाने खरेदी करताहेत. यावर आमदार, खासदार, लोकनियुक्त प्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सदस्य, शेतकरी संघटना तसेच समाजातून कोणीही उठाव करण्याचा साधा प्रयत्न देखील करत नाहीत.
खोडवा आले पिकाचा दर दिवसेंदिवस ढासळत असल्याने शेतकरी वर्गात आधीच चिंतेत आहे. शेतकरी आले लागवडीसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करत असतो. सध्या आले व्यापाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी खोडवा आले खरेदी करताना शेतकऱ्यांचे अक्षरशः लचके तोडले असल्याची तक्रार होत आहे. गतवर्षी लागवड केलेल्या आल्याला ( म्हणजे दिडीचे आले) व्यापाऱ्यांच्या मनमानीने ग्रासले आहे. लागवडीपासून दीड वर्षांनी जेव्हा हे दिडीचे आले काढले जाते, त्यावेळी त्यात जुना माल मोठ्या प्रमाणात तर नवीन माल तुलनेने कमी निघत असतो.
आजपर्यंत नेहमी या आल्याच्या काढणीवेळी जुन्या व नव्या मालाला सद्यस्थितीचा एकच दर मिळत होता. मात्र, यावर्षी व्यापाऱ्यांनी अशा खोडवा आले पिकाच्या जुन्या मालाला सुमारे 13 ते 14 हजार रुपये प्रति गाडी (पाच क्विंटल) तर नव्या मालाला सुमारे 4 हजार रुपये प्रति गाडी याप्रमाणे दर काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत आले उत्पादक शेतकऱ्यांना छळणाऱ्या व्यापाऱ्यांना शासनाने काहीतरी निर्बंध लावावेत, तातडीने कृषी विभागाच्यावतीने बैठक आयोजित करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आले हे वर्षभराचे पीक असते. मात्र, दर नसेल तर शेतकरी आल्याचे पीक जमिनीत आणखी सहा महिने ठेवून दराची वाट पाहतो. दरम्यान त्या आल्यात नवीन वाढ होत असते. सुमारे दीड वर्षानंतर पीक काढले जाते. त्यावेळी त्यात नवीन मालाची वाढ झालेली असते. दर एकच असल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक लाभ होऊन अधिक माल निघाल्याचे समाधानही मिळत होते. मात्र, व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारावर कुणाचाच धाक नसल्याने अशी अवस्था झाली आहे. अशा व्यापाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांचे धंद्याचे लायसन्स जप्त करावे.
बापूराव पांडेकर
आले उत्पादक शेतकरी