Hijab row : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर घातलेली बंदी मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा दोनच दिवसापूर्वी केली होती. त्यानंतर भाजपाकडून जोरदार टीका झाल्यानंतर आता या निर्णयावर कर्नाटक सरकारने त्यांच्या निर्णयावरून युटर्न घेतला आहे. याविषयी राज्याचे गृहराज्यमंत्री जी.परमेश्वर यांनी महत्वाचे विधान केले आहे.
हिजाबवरील बंदी उठविण्याबाबत सखोल विचार केला जाईल आणि मगच त्याबाबत निर्णय घेऊ,” असे म्हणत परमेश्वर यांनी सरकारच्याच निर्णयावर प्रतिक्रिया दिली. तसेच “सरकारने हिजाब बंदी मागे घेण्याबाबत कोणतीही सूचना काढलेली नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे ते नेमके काय म्हणाले, हे तपासावे लागेल. हिजाब बंदी मागे घेण्यासाठी आम्हाला या विषयाचा सखोल अभ्यास करावा लागेल. त्यानंतरच निर्णय घेता येऊ शकतो”, असे महत्वाचे विधान परमेश्वर यांनी केले आहे.
Mangaluru | On Hijab row in Karnataka, state Home Minister Dr G Parameshwara says, “Basavaraj Bommai (former CM) clarified that they have not made any order (regarding hijab). CM Siddaramaiah himself said that even if it is done, we will check it. The government will make… pic.twitter.com/FMD7lGDZLm
— ANI (@ANI) December 25, 2023
दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी २२ डिसेंबर रोजी एका जाहीर कार्यक्रमात बोलत असताना शाळा आणि महाविद्यालयातील हिजाब बंदी मागे घेण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. “प्रत्येकाला त्याच्या आवडीचे कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान मोदी यांचा ‘सबका साथ, सबका विकास’ (सर्वांची साथ, सर्वांचा विकास) ही घोषणा फसवी आहे. भाजपा कपड्यांवरून आणि जातीपातींवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हिजाब बंदी मागे घ्यावी, अशा सूचना मी दिल्या आहेत”, असे विधान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर सभेत केले होते.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वक्तव्यानंतर भाजपाकडून कडाडून विरोध झाला. काँग्रेस सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली. हिजाब बंदी सारखे विषय काढून काँग्रेस केवळ राजकीय लाभ उचलण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले. बोम्मई म्हणाले की, हिजाबला संपूर्ण राज्यात बंदी नाही. फक्त ज्या ठिकाणी विशिष्ट गणवेष परिधान करण्याचे नियम आहेत, त्या ठिकाणी हिजाब घालण्यास परवानगी नाही. बाकी राज्यात मुस्लीम महिला हिजाब परिधान करू शकतात. जर राज्यात हिजाब घालण्यावर बंदीच नाही, मग बंदी उठविण्याचा प्रश्न येतोच कुठे? असा सवालही माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उपस्थित केल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.