पाटणा – बिहार मध्ये भाजप आणि जेडीयु पक्षामध्ये मोठीच दरार पडली असून या युतीचे सरकार मोडण्याच्या स्थितीत आले आहे असे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी उद्या मंगळवारी आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक पाटण्यात आयोजित केली असून त्या बैठकीतच भाजपबरोबरची युती तोडण्याचा निर्णय नितीशकुमार घोषित करण्याची शक्यता आहे असे सांगितले जात आहे.
आज नितीशकुमार यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दूरध्वनी केला. त्यांच्यात काय बोलणे झाले हे कळले नाही, पण नितीशकुमार हे पुन्हा विरोधकांच्या महागठबंधन मध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने पुन्हा नितीशकुमार यांच्याशी जुळवून घेण्याची तयारी दर्शवली आहे असेही सांगण्यात येत आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी सांगितले की, संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षाच्या नेत्यांची एक संयुक्त बैठक उद्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही तरी मोठ्या घडामोडी लवकरच घडतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की आम्ही भाजपच्या विरोधात लढाई करीत आहोत. आमच्या या लढाईत संयुक्त जनता दल आमच्या बरोबर येणार असेल तर आम्ही त्यांना बरोबर घेऊ असे तिवारी म्हणाले.
नितीशकुमार यांचे भाजपशी अनेक मुद्द्यावरून मतभेद आहेत. संयुक्त जनता दलाचे नेते आरसीपी सिंह यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे. त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती त्यामुळे संयुक्त जनता दल फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले होते. तेव्हापासून नितीशकुमार हे अस्वस्थ होते. जेडीयु आणि भाजप यांच्यात युती असतानाही मोदींच्या मंत्रिमंडळात जेडीयुचा केवळ एकच मंत्री समाविष्ट करण्यात आला होता. हेही सुरूवातीपासूनचे नाराजीचे कारण आहे. या खेरीज अन्यही कारणामुळे भाजप आणि नितीशकुमार यांच्यात वितुष्ट आले होते.