Maharashtra Rain – संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाने दडी मारली होती. सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतर राज्यात विविध भागात पाऊस बरसत आहे. मात्र उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार असून गुरुवारपासून पुन्हा काही भागात पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज सोमवारी मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमधील काही भागात जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, संपूर्ण खानदेश, मध्यमहाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड भागातही पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
मागील तीन ते चार दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. आजही राज्याच्या काही भागात पाऊस झाला. पण उद्यापासून पावसाचे प्रमाण कमी होत जाणार आहे. तर गुरुवारपासून राज्याच्या काही भागात पुन्हा पाऊस सुरु होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
मंगळवारी (दि. 12) राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम तर कोकणातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बुधवारीही राज्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज आहे.
गुरुवारपासून विदर्भाच्या काही भागात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर शुक्रवारी विदर्भातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाविना गेल्यामुळे राज्यातील खरीप हंगामातील पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरडवाहू जमीनितील सोयाबीन पीक 80 ते 90 टक्के हातातून गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून बरसत असलेल्या पावसांमुळे शेतीच्या इतर पीकांना चांगला फायदा होत आहे.