लाहोर – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांची 36 धावा करत कसोटी क्रिकेटमध्ये नीचांकी धावसंख्या नोंदवली.
भारतीय संघाच्या या सुमार कामगिरीवर सध्या प्रचंड टीका सुरू असली तरीही पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने मात्र, विश्वास व्यक्त करत या मालिकेत भारतीय संघ दमदार पुनरागमन करेल, असेही मत व्यक्त केले आहे.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतत असल्याने भारतीय संघाला या मालिकेत परतणे कठिण वाटत असले तरीही सध्याच्या भारतीय संघाच्या फलंदाजांची गुणवत्ता पाहिली तर ते निश्चितच यशस्वी पुनरागमन करतील, असे आफ्रिदी म्हणाला.
कोहली भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचे नेतृत्व आले आहे. 26 डिसेंबरपासून भारतीय संघ दुसरा कसोटी सामना खेळेल. पृथ्वी शॉची सुमार कामगिरी, महंमद शमीने दुखापतीने घेतलेली माघार यांमुळे अंतिम 11 खेळाडूंचा संघ निवडताना संघ व्यवस्थापनासमोर अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. मात्र, तरीही भारतीय संघ या कामगिरीला मागे टाकून सरस कामगिरी करेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.