– अमित डोंगरे
भारतीय संघ आजपासून इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. ही मालिका संघातील नवोदितांसाठी आपली गुणवत्ता व कामगिरी सिद्ध करण्याची नामी संधी आहे.
या मालिकेनंतर जरी भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार नसला तरीही यंदा ऑक्टोबरमध्ये भारतातच होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या पूर्वतयारीचा सराव संघातील नवोदितांना करता येणार आहे.
तसे पाहिले तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने यंदाच्या वर्षात सुरूवातीलाच आमच्यासाठी एकदिवसीय सामन्यांची मालिका फारशी उपयुक्त ठरणार नाही असे सांगितले होते. तेव्हा त्याच्यावर टीकाही झाली होती. मात्र, एक व्यावसायिक क्रिकेटपटू कसा असावा याचे कोहली मूर्तीमंत उदाहरण आहे.ज्या प्रकारचे सामने भारतीय संघ यंदाच्या वर्षात सर्वात जास्त खेळणार आहे त्याबाबतच जास्त गंभीर राहणे गरजेचे आहे. इंग्लंडचा संघ भारताच्या दीर्घ दौऱ्यावर आल्यामुळे आधी कसोटी, टी-20 व एकदिवसीय अशा तीनही प्रकारात मालिका खेळवली जात आहे.
ही मालिका पार पडल्यावर भारतीय खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळणार आहेत. त्यानंतर आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होणार आहे. तसेच यंदाच्याच वर्षात भारतात टी-20 विश्वकरंडक स्पर्धाही होत आहे. आशिया करंडकाबाबत अद्याप काहीही निश्चत झाले नसले तरीही ही स्पर्धा एकदिवसीय सामन्यांच्या जागी टी-20 स्वरुपातच खेळवली जाणार आहे. त्यामुळे याच
स्पर्धेतून भारतीय संघाला आगामी विश्वकरंडक स्पर्धेचा सराव मिळणार आहे.
भारतीय संघात सूर्यकुमार यादव व प्रसिध कृष्णा या नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळेल अशी खात्री सध्यातरी सूर्यकुमारच्याच बाबतीत देता येईल. या खेळाडूने गेल्या वर्षी अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेत तसेच त्यानंतरच्या सय्यद मुश्ताक अली व विजय हजारे करंडक स्पर्धेत आपल्या बॅटचा तडाखा सिद्ध केला आहे. तसेच त्याला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही संधी दिली गेली व त्याने कर्णधार व संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवताना अफलातून कामगिरी केली.
ज्या सूर्यकुमार यादवने खुद्द कोहलीशीच आयपीएल स्पर्धेत पंगा घेतला होता तोच सूर्यकुमार आज केवळ दोन सामन्यांत कोहलीच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे. मैदानभर फटके मारण्याची क्षमता आहे. उच्च दर्जाच्या गोलंदाजीची पिसे काढण्याची धमकही आहे. मुळातच त्याच्याकडे आक्रमक फलंदाजीसाठी आवश्यक असे तंत्र तर आहेच पण आक्रमक मानसिकताही आहे आणि हीच मानसिकता त्याला अन्य फलंदाजांपेक्षा निराळा सिद्ध करते.
काही वर्षांपूर्वी मुंबईच्या क्रिकेटला ओहोटी लागली असे सांगितले जात होते त्याच मुंबईच्या सूर्यकुमारने मुंबईच भारतीय क्रिकेटची राजधानी असल्याचेही सिद्ध केले. या मालिकेसाठी निवडलेल्या संघात शुभमन गिल, प्रसिध कृष्णा, टी. नटराजन, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर या नवोदित खेळाडूंना संघात आपले स्थान पक्के करण्याची ही नामी संधी आहे. यात त्यांना यश आले तर भारतीय संघालाच भविष्यात सामने जिंकून देणारे खेळाडू मिळणार आहेत.