गांधीनगर – केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून अनेक विरोधकांनी देशाचे नाव असलेली इंडिया आघाडी स्थापन केली आहे. मात्र या आघाडीमधले नेते तर देशविरोधी, देशद्रोही आहेत, असे दिसून येत आहे. माझ्या वडिलांनी ४० वर्षे काॅंग्रेससाठी काम केले. मात्र पक्षाने सतत्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. म्हणून मी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन रोहन गुप्ता यांनी केले आहे.
12 मार्च रोजी जाहीर झालेल्या काँग्रेस उमेदवारांच्या यादीत रोहन गुप्ता यांचेही नाव होते. मात्र त्यांनी उमेदवारी मागे घेतली. वडिलांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे ते निवडणूक लढवू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुप्ता यांनी काॅंग्रेसच्या एका नेत्यावर सततचा अपमान आणि चारित्र्य हननतेचा आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला होता.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रोहन गुप्ता म्हणाले, किती विरोधाभास असू शकतो. काॅंग्रेसचा एक संपर्क प्रभारी नेता आहे, ज्याचे नाव राम आहे, सनातन धर्माचा अपमान झाला तेव्हा त्यांनीच आम्हाला गप्प राहण्यास सांगितले. आज इंडिया नावावर युती झाली. पण त्यात देशद्रोहीच सामील झाले आहेत.
खलिस्तानी लोकांशी संबंध असल्याचा आरोप ज्या केजरीवाल यांच्यावर काॅंग्रेसने केला होता, तेच केजरीवाल आज त्यांना पाठिंबा देत आहेत, ही काय मजबुरी आहे? गुप्ता यांनी गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष शक्तीसिंह गोहिल यांना पत्राद्वारे आपले नाव मागे घेण्याबाबत कळवले आहे. १५ वर्षे काँग्रेससोबत राहिल्यानंतर आता पक्षाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.