जयपूर – राजस्थानातील दलित अत्याचाराच्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर चौफेर टीका होत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी, राज्यातील काँग्रेस सरकारला गुन्हेगारी कमी करण्यामध्ये अपयश आल्यानेच नागौर येथील घटना घडल्याचा आरोप लगावला आहे. नागौर येथे चोरीच्या आरोपावरून दोन दलित युवकांना बेदम मारहाण करत त्यांचा अमानुष छळ करण्यात आला होता. मेघवाल यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने पीडितांची भेट घेतली.
वाचा काय आहे नागौर दलित अत्याचार प्रकरण?
नागौर येथील दोन युवकांना गॅरेजमध्ये चोरी केल्याचा संशयातून बेदम मारहाण करण्यात आली होती. या बाबतचा एक व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं. या व्हिडिओमध्ये गॅरेजचे कर्मचारी त्या युवकांना रबरी पट्ट्याने मारहाण करताना दिसत आहेत. मारहाण करणाऱ्यांनी अमानुषतेचा कळस गाठत पीडित तरुणांपैकी एका तरुणाच्या गुप्तांगामध्ये पेट्रोलमध्ये बुडवलेले स्क्रू-ड्रायव्हर घुसवल्याचे व्हिडिओद्वारे निदर्शनास आले आहे.
पिडीतांवरच दाखल केला गुन्हा!
पोलिसांनी याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत भीम सिंग, इदान सिंह, हनुमान सिंह, रघुवीर सिंग, छैलसिंग, छतरसिंग आणि रेहमतुल्ला या सात आरोपीना अटक केली आहे. मात्र पीडित दलित युवकांविरोधात देखील चोरीचा गुन्हा नोंदवून घेण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिस महासंचालक भूपेंद्र सिंह यांनी दिली.
पोलिसांकडून दिशाभूल केली जात असल्याचा मेघवाल यांचा आरोप
भाजपच्या शिष्टमंडळाचे प्रमुख अर्जुन मेघवाल यांनी आज पीडितांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाला भेट देत गुन्हा नोंदवण्यात आलेल्या पंचोडी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. याप्रकरणी पोलिसांकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत मेघवाल यांनी शिष्टमंडळाचा अहवाल भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना सोपवणार असल्याची माहिती दिली.