शेतकऱ्यांना बसतोय फटका ः जलप्रदुषणाच्या पातळीने कमाल मर्यादा ओलांडली
पळसदेव- भीमा नदीपात्रात प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात आहे. तसेच औद्योगिक वसाहतीमधून रसायनमिश्रीत पाणी देखील नदी पत्रात सोड÷ण्यात आहे. त्यामुळे भीमा नदीचे पाणी प्रदूषित झाले असून नदीचा श्वास गुदमरला आहे. तसेच उजनी धरणात असलेला पाण्याने जलप्रदुषणाच्या पातळीने कमाल मर्यादा ओलांडली आहे. सध्या उजनीच्या पाण्यावर हिरव्या गर्द रंगाचा तवंग दिसून येत असून या दूषित पाण्याचा मोठा फटका उजनीलगतच्या शेतकऱ्यांना बसत आहे.
धरणातील जलचरांच्या प्रजाती नामशेष होण्याबरोबर शेतीला मोठा फटका बसू लागला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न घटण्याबरोबच शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत खराब झाला आहे. धरण बांधणी काळात विस्थापित होण्याचे संकट ओढवलेल्या धरणग्रस्तांवर आता जलप्रदूषणाचे मोठे संकट घोंगावत आहे. पुण्यालगतच्या भागातील धरण साखळी पावसाळ्यात भरल्यानंतर येथून पाण्याचा विसर्ग सोडला जातो. हे पाणी थेट उजनी धरणात अडविले जाते.
दरम्यान, पुण्यालगतचे शहरीकरण, औद्योगिकरणाचे सांडपाणी व रसायनमिश्रीत पाणी पावसाळ्यात भीमा नदीपात्रात सोडून देण्यात येते. उजनी धरण व उजनीचे बॅकवॉटर क्षेत्र मोठे आहे. धरण दरवर्षी 110 टक्के भरले जाते. परंतु सध्या उजनी धरणाचे पाणी विषारी बनले आहे. यामुळे येथील शेती व्यवसायासह मत्स्यव्यवसायही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस येथील जलप्रदुषणात वाढ होत आहे. मात्र, यावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणेकडून कोणतीच उपाययोजना होताना दिसत नाही.
- कॅन्सरचे रुग्ण वाढले
सध्या भीमा नदीकाठावरील गावात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहेत. उजनीलगतच्या विहिरींमध्ये या पाण्याचे अंश उतरला आहे. यामुळे मानवी व जनावरांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. - जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर प्रदूषित पाण्याचा केवळ शेती व मानवाला फटका बसला नसून उजनीतील जलचरांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. उजनीत सध्या देशी प्रजातीचे मासे मिळणे मुश्किल झाले आहे. याचा फटका स्थानिक मच्छिमारांना बसला आहे. त्यामुळे त्यांना चरितार्थ चालविणे अवघड झाले आहे. उजनीतील प्रदुषणावर वेळीच आळा न घातल्यास त्या दीर्घ परिणाम धरणग्रस्त विस्थापितांना भोगावे लागणार आहेत.