पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणेकरांचे जीवनमान शाश्वत शैलीला अनुकूल राहील यासाठी आग्रही राहणार असून, त्यादृष्टिने शहराच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या मदतीने विकास प्रकल्प राबविणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी, शिवाजी हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रस्ता या परिसरात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, आदित्य माळवे, सनी निम्हण, राजश्री काळे, विनोद ओरसे, रविंद्र साळेगावकर, सतीश बहिरट, संदीप काळे, गणेश बगाडे, योगेश बाचल, अपर्णा गोसावी, अपर्णा कुऱ्हाडे, दत्तू धोत्रे, अनिता पवार, विनोद धोत्रे, उषा नेटके, आकाश धोत्रे, विनायक कोतकर,दिलीप शेळके, रोहित शेळके, राजेंद्र निकम यांचा प्रमुख सहभाग होता.
मोहोळ म्हणाले की, पुणे शहर २०५० पर्यंत कार्बन उत्सर्जनमुक्त करण्यासाठीचा आराखडा तयार आहे. या आराखड्यात वातावरणीय बदलांचे धोके टाळण्यासाठी आवश्यक कार्बनमुक्त शहर, स्वच्छ पर्यावरण आणि नैसर्गिक संकटांना तोंड देणारी सक्षम यंत्रणा या त्रिसूत्रीवर आधारित शहरातील इमारतींचे हरित इमारतींमध्ये रूपांतर,
औद्योगिक परिसरात कार्यक्षम उर्जा उपयोजनांची अंमलबजावणी, जलव्यवस्थापनासाठी कार्यक्षम ऊर्जा प्रणाली, सर्व इमारतींवर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प, सौर वॉटर हिटरला प्रोत्साहन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण, इलेक्ट्रिक व्हेइकल वापराला प्रोत्साहन व चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, बांधकाम नियमावलीत रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक, जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन प्रकल्प, हरित आच्छादनात वाढ, विस्तृत भूजल पुर्नभरण कार्यक्रम, शाश्वत नदीकाठ विकसन, विकेंद्रीत कचरा व्यवस्थापन यावर भर देणार असून पुणे क्लायमेट प्लॅनची अंमलबजावणी करणार आहे.
मोहोळ म्हणाले की, शाश्वत जीवनशैलीच्या दिशेने शाश्वत ऊर्जा स्त्रोतांच्या वापरावर भर, अधिकाधिक इलेक्ट्रिक व सीएनजी बसचा वापर, सौरऊर्जा निर्मितीला चालना, पर्यावरणपूरक इंधन पुरवठ्यावर भर, २०३० पर्यंत पीएमपीच्या सर्व बस पर्यावरपूरक इंधनावरच धावणाऱ्या असतील,
सौरऊर्जा निर्मिती व वापरास चालना देण्यासाठी करांमध्ये सवलत, स्वयंपाकाचा गॅस पाइपद्वारे पुरविणे तसेच वाहनांसाठी सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या केंद्रांची उभारणी, सीएनजीवर चालणाऱ्या बस, रिक्षा तसेच खासगी वाहनांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढवणाऱ्यावर भर आणि पर्यायाने प्रदूषणात मोठी घट करून पुणेकरांचे आरोग्य जपण्यावर भर देणार आहे.