नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आता त्या प्रकरणाची सुनावणी नव्या वर्षात होणार असल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी सत्तासंघर्षाच्या संदर्भात विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. ठाकरे गटाने मंगळवारी न्यायालयात तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. महाराष्ट्रात पूर्णपणे घटनाबाह्य सरकारचे कामकाज चालू आहे.
त्यामुळे तातडीने सुनावणी घेण्याची गरज आहे, अशी बाजू ठाकरे गटाच्या वतीने वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी मांडली. मात्र, पुढील आठवड्यात पाच सदस्यीय घटनापीठाला संबंधित प्रकरणावर सुनावणी घेणे शक्य होणार नाही. सुनावणी 13 जानेवारी 2023 ला घेऊ, असे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड आणि न्या.पी.एस.नरसिंहा यांच्या पीठाने स्पष्ट केले.
काही महिन्यांपूर्वी शिंदे गटाने केलेल्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्रात सत्ताबदल झाला. तो सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला आहे. न्यायालय आणि आयोग काय निर्णय देणार याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.