नवी दिल्ली :– गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी लखीमपूर खेरी (Lakhimpur violence case) येथे निदर्शने केली होती. त्यावेळी निदर्शक शेतकऱ्यांवर कार चालवून चार शेतकरी आणि एका पत्रकाराच्या मृत्यूस कारणीभूत असल्याबद्दल केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या विरोधात आता हत्येचा खटला चालवला जाणार आहे.
लखीमपूर येथील न्यायालयाने आज मिश्रा आणि अन्य आरोपांविरोधातील आरोप निश्चित केले. येत्या 16 डिसेंबरपासून खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे. एक महिन्यापूर्वीच न्यायलयाने आशिष मिश्राची याचिका फेटाळली होती.
सदर घटनेत मरण पावलेले पत्रकार रमण कश्यप यांचे बंधु पवन कश्यप यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. विलंब झाला मात्र न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Gujarat Election 2022 : निकाल येण्यापूर्वीच कॉंग्रेसला गुजरातमधील पराभव मान्य?
घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे प्रतिनिधित्व करणारे वकिल मोहम्मद अमान म्हणाले की, खटल्यात विलंब झाला आहे. आरोपींविरूध्द आरोप निश्चित करण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी गेला आहे. तेही सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर झाले आहे. आता मला वाटते खटल्याचे कामकाज वेगाने व्हावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा आहे.