पुणे,राजगुरूनगर (रामचंद्र सोनवणे) – राजगुरूनगर येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या आमरण उपोषणातील उपोषणकर्ते अजय स्वामी यांची तब्बेत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राजगुरूनगर शहरात ६ दिवसांपासून अंकुश राक्षे, मनोहर वाडेकर, विकास ठाकूर आणि अजय स्वामी या चार जणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.यादरम्यान त्यांनी आरोग्य सेवा नाकारली होती. (Rajgurunagar)
चार जणांपैकी विकास ठाकूर यांना उपोषणाच्या चौथ्या दिवशी अस्वस्थ वाटत होते तर आज सहाव्या दिवशी अजय स्वामी यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. डॉ महेश दहीवाल यांनी उपोषणकर्ते अजय स्वामी यांची तपासणी केली असता त्यांना ताप व त्यांच्या शरीरातील साखर कमी झाल्याने अशक्तपणा वाढला असल्याचे समजले.
मराठा आरक्षण (Maratha Arakshan) मिळण्यासाठी खेड तालुक्यात (Khed Taluka) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गावागावात आंदोलने सुरू आहेत. पुढाऱ्यांना गाव बंदी करीत काही ठिकाणी आमरण उपोषणाला नागरिक बसले आहेत. राजगुरूनगर शहरात बस स्थानकात येणाऱ्या एसटी बसवरील जाहिरातीमधील पंतप्रधान मुख्यमंत्री यांच्या फोटोना काल राजगुरूनगरमध्ये काळे फासले होते.आज तालुक्यातील नागरिकांच्या वतीने राजगुरूनगर शहरात कँडल मार्च काढण्यात आला
दरम्यान राजगुरूनगर शहरात (Rajgurunagar city) कमालीची शांतता आहे . एसटी बस सेवा बंद आहे तर पीएमपीएल सेवा कमी जास्त प्रमाणत सुरू होती. राज्यात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात आल्याने आणि मागील आरक्षण आंदोलनात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहत शहरात गर्दी टाळली. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बस सेवा नसल्याने घरी राहणे पसंत केले.
मराठा आरक्षण मागणीसाठी राज्यात जाळपोळ आणि आंदोलने सुरू झाले आहे. या धर्तीवर राजगुरूनगर एसटी बस आगारातून सोडण्यात येणाऱ्या बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित घटना घडू नयेत यासाठी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे प्रवासी नागरिकांचे मोठे हाल झाले. नोकरदार व विद्यार्थी वर्गाला एस टी बस सेवा बंद चा त्रास सहन करावा लागला.