अर्शद आ. शेख
श्रीगोंदा – श्रीगोंद्याचे तहसीलदार, त्यांचा सर्व स्टाफ अन् पोलीस अधिकारी व कर्मचारी तालुकाभर शोधमोहीम राबवित होते. दवंडी देत होते..उद्याच्या “व्हीव्हीआयपी’ला राज्यपालांचा निरोप देण्यासाठी. सध्याच्या प्रगत टेक्नॉलॉजीचा विचार करता निरोप देण्यासाठी एवढी यातायात आजच्या नेटीझन्सना हास्यास्पद वाटेल. पण हे खरे आहे. कारण होते राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी दुसऱ्या दिवशी होणार होता.
राज्यपालांचा निरोप कलेक्टर साहेबांना आला. त्यांनी तो श्रीगोंद्याच्या तहसीलदारांना बिनतारी यंत्रणेद्वारे (वायरलेस) कळविला. बा. म. भारस्कर यांनी शपथविधीसाठी उद्या साडेनऊ वाजता राजभवनात उपस्थित राहावे, हा तो निरोप होता. तेव्हा लॅंडलाइन नव्हते. मोबाइलचा विषयच नाही. संपर्काचे अतिजलद माध्यम म्हणजे तार (टेलिग्राम) ती सुद्धा पोस्ट ऑफिस असेल तेथेच शक्य होती. उद्याचे नामदार कोठे आहेत, काहीच खबर नव्हती. निरोप पोहोचला नाही, तर नामदारपद तर हुकणारच, शिवाय शासनाची कारवाई तहसीलदारांवर होण्याची टांगती तलवार सरकारी यंत्रणेपुढे होती.
इनामदार नावाचे तेव्हाचे तहसीलदार अस्वस्थ झाले. तार पाठवायची तर ती पोस्ट ऑफिस असेल ती तेथवरच पोहोचते. मग श्रीगोंद्याच्या चहू बाजूला माणसं रवाना झाली. माजी सरपंच कांतिलाल भंडारी यांचा ट्रक घेऊन मिरजगाव भागात सरकारी लोक गेले. तेथे आठवडे बाजार होता. बाजारात चक्क दौंडी देण्यात आली. ऍड. रामचंद्र ऊर्फ बाबासाहेब फडणीस यांची कार दुसऱ्या दिशेने पाठविली. काही जणांना लोणी-बेलवंडी-कोळगावकडे धाडले. गावोगावी दवंड्या पिटल्या, ऐका हो ऐका… ज्या कोणाला आमदार साहेब दिसतील, त्यांना तातडीने राजभवनावर पोच होण्याचा निरोप द्या… अशा आरोळ्या गावोगाव दुमदुमल्या.
भारस्करांचा शोध लागत नव्हता. तशी सरकारी यंत्रणेची धाकधूक वाढत होती. अखेर लोणी व्यंकनाथ येथे आमदार साहेब असल्याचे समजले. धापा टाकत सरकारी यंत्रणा तेथे गेली. सरकारचा निरोप दिला. मंत्रिपदाची ऑफर ऐकून भारस्कर यांना धक्काच बसला. चेष्टा करता की काय ? असे ते म्हणाले. मग सावरले.
सायंकाळी रेल्वेने मुंबईकडे जाण्यासाठी बॅग भरली. शपथविधी करिता भारदस्त कपडे नव्हते. शिवून घेण्याइतका वेळ नव्हता. त्यांच्या एका सहकाऱ्याने (शिवाजीराव जंगले यांचे पिताश्री) यांनी कपडे दिले. दुसऱ्या दिवशी राजभवनावर दहा वाजता राज्यपालांच्या साक्षीने राजदरबारात, मी बाबूराव महादेव भारस्कर, ईश्वराला साक्ष ठेवून शपथ घेतो की. हे शब्द घुमले नामदारकीसह तालुक्याला पहिला लाल दिवा मिळाला अन् राज्यात मातंग समाजातील पहिला कॅबिनेट मंत्री म्हणून भारस्कारांचे नाव इतिहासात कोरले गेले.
सायकल ते लाल दिवा एक अद्भुत प्रवास
बारा वर्षांपूर्वी याबाबत स्वतः भास्कर यांनी एका पत्रकाराला मुलाखत दिली होती. या संदर्भात त्यांना तेव्हा विचारले असता ते म्हणाले, मी बेलवंडी स्टेशन महादेववाडीहून सायकलने लोणीकडे जात होतो. तेव्हा रस्ता नीट नव्हता. लोणीच्या चावडीत सायकल लावली. तेथे पी. डी. पाटील यांच्याशी (माजी उपसरपंच सुनील पाटील यांचे पिताश्री) गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात मला हा निरोप मिळाला. प्रारंभी खरे वाटले नाही. सायंकाळी रेल्वेने मुंबई गाठली अन् दुसऱ्या दिवशी शपथविधी झाला. सायकल ते लाल दिव्याची ऍम्बेसेडॉर हा प्रवास विस्मयकारी होता.