नवी दिल्ली – महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी राज्यसभा खासदार मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन राज्यातील सद्य स्थिती विषयी चर्चा केली. आगामी काळात लोकसभा आणि लगेचच विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत त्या संबंधात आम्ही चर्चा केली असून आम्ही आमची काही मते वासनिक यांना कळवली आहेत त्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असे एका कॉंग्रेस नेत्याने सांगितले.
या चर्चेच्या संबंधात माहिती देताना प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, राज्यातील भाजपला हद्दपार करणे हे आमचे एकमेव कर्तव्य आहे आणि तो हेतू लक्षात ठेऊन जागा वाटप निश्चीत केले जाईल. जागावाटप गुणवत्तेवर आधारित असेल असेही त्यांनी नमूद केले.
नागपुरात काँग्रेसच्या ‘है तय्यार हम’ रॅलीत आपल्या भाषणात राहुल गांधी गुरुवारी म्हणाले आहेत की “ही विचारसरणीची लढाई आहे. आम्ही एकत्र येऊन महाराष्ट्रात आणि देशातील निवडणुका जिंकणार आहोत.कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त ही सभा आयोजित करण्यात आली होती. व त्यात कॉंग्रेसने आपल्या प्रचाराचे रणशिंग फुंकले होते.