मुंबई – अयोध्येत राम मंदिर होते आहे ही आनंदाची बातमी आहे. मला २२ जानेवारीच्या सोहळ्याचे निमंत्रण मिळालेले नाही आणि मला त्याची गरजही नाही. २२ जानेवारी या दिवशीच तेथे गेले पाहिजे असे काही नाही. मी मला जेंव्हा वाटेल तेंव्हा तेथे दर्शनाला जाऊ शकतो. मंदिराच्या बांधकामाच्या अगोदरही मी तेथे दर्शनासाठी गेलो होतो असे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राम मंदिर आंदोलनाच्या वेळी शिवसैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करत ते म्हणाले, हिंदुत्व आणि राम मंदिराचा प्रचार केल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. असंख्य शिवसैनिकांनी आणि कारसेवकांनी राम मंदिरासाठी त्याग केला आहे. ज्यावेळी शिवसेना- भारतीय जनता पार्टीचे सरकार होते तेंव्हा सरकार कायदा करून राम मंदिर बनवेल असे मला वाटले होते. मात्र तसे झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे मंदिर होते आहे.
राष्ट्रवादीशी बोलणी जवळपास पूर्ण
आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या संदर्भात बोलताना उध्दव म्हणाले की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी बोलणी जवळपास पूर्ण झाली आहे. मात्र दोन्ही पक्षांत कोणकोणत्या जागांबाबत चर्चा अथवा सहमती झाली आहे याचा तपशील त्यांनी दिला नाही. कॉंग्रेससोबतच्या जागावाटपासंदर्भात बोलताना ते म्हणाले की आमचे सगळे बरोबर चालले आहे. १९ डिसेंबर रोजी दिल्लीत इंडिया आघाडीची जी बैठक झाली त्यात माझी राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा झाली आहे. चर्चेत संजय राऊतही माझ्यासोबत होते. कॉंग्रेस नेत्यांना आम्ही आमचे म्हणणे सांगितले आहे. कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील किंवा दिल्लीतील कोणी मोठे नेते त्यांच्याकडून मला काही सांगत नाहीत तोपर्यंत मीही यावर काही बोलणार नाही. तसेच वंचित बहुजन आघाडीबाबत माझ्याकडे कोणता फॉर्म्यूला नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपाच्या संदर्भात जो फॉर्म्युला दिला आहे तो त्यांचा स्वत:चा फॉर्म्युला आहे. जागावाटपाबाबत आमची त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. लवकरच आंबेडकर आणि संजय राऊत यांची याबाबत बोलणी होणार आहे. मात्र सध्या तरी काही फॉर्म्युला तयार करण्यात आलेला नाही असेही उध्दव यांनी नमूद केले.