मुंबई – बीसीसीआयने शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत आयपीएल दुबईत आयोजित केली जाईल, असे सांगितले असले तरीही ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत आयसीसी काय निर्णय घेते यावरच सर्वकाही अवलंबून आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आयसीसीने टी-20 विश्वकरंडकाला महत्त्व दिले तर बीसीसीआयच्या पदरी निराशाच पडणार आहे.
आयसीसीने या सर्व निर्णयांसाठी दोन वेळा बैठका घेतल्या होत्या. बीसीसीआयने आयसीसीला इशाराही दिला होता. मात्र, भारत सरकारने मोहोर उमटवली तरच स्पर्धेचे आयोजन दुबईत शक्य होणार आहे.
त्यातही आयसीसीने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत वेट ऍण्ड वॉच भूमिका घेतली तरी बीसीसीआयच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाणार आहे. करोनाचा धोका कायम असल्याने आयसीसी काय निर्णय घेते यावरच बीसीसीआयचे भवितव्य अवलंबून आहे.
आयपीएलचा 13 वा मोसम यंदा दुबईत होणार असे बैठकीत सर्व सदस्यांच्या एकमतानंतर जाहीर करण्यात आले असले तरीही या स्पर्धेसमोरचे अडथळे अद्याप संपुष्टात आलेले नाहीत. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा निश्चित करण्यात येत असली तरी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धादेखील ऑक्टोबरपासून सुरू होत असल्याने आयसीसीच्या निर्णयावरच सर्वकाही
अवलंबून आहे.
देशांतर्गत स्पर्धा रद्द, शिबिर अहमदाबादेत
करोनाचा धोका कायम असल्याने येत्या वर्षाअखेरपर्यंत भारतातील सर्व देशांतर्गत स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून संघाचे आयपीएल व अन्य काही स्पर्धांसाठीचे सराव शिबिर अहमदाबादमध्ये होणार असल्याचे संकेतही बीसीसीआयने दिले आहेत. शुक्रवारी झालेल्या बैठकीत शिबिरासाठी दुबई, अहमदाबाद व धर्मशाळा या तीन ठिकाणांना पसंती देण्यात आली होती. मात्र, हे शिबिर परदेशात आयोजित करणे करोनाच्या नियमांमुळे शक्य होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. तिथे दाखल झाल्यावर खेळाडूंना 14 दिवस विलगीकरणात राहावे लागेल. त्यामुळे बीसीसीआयवर इतक्या दिवसांच्या खर्चाचा बोजा येऊ शकतो, त्यामुळे हे शिबिर देशातच घेण्याकडे बीसीसीआयचा कल आहे.