मुंबई – राज्यसभा निवडणूकीत भाजपने बाजी मारल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये चलबिचल वाढली असताना आता राजकीय वर्तुळाचे संपूर्ण लक्ष विधानपरिषदेच्या निवडणूकीकडे वेधले आहे. राज्यातील 10 जागांसाठी होणा-या या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या, सोमवारी संपत असून विधान परिषद निवडणुकीचेही चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्यसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रणनिती यशस्वी ठरल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे भाजपकडून जाहीर केलेले पाच अधिकृत उमेदवारांसह पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांचा अर्ज कायम राखला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपकडे पुरेशी मते नसताना भाजपने खोत यांची उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यास दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे.
विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि कॉंग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. तसेच राष्ट्रवादीने अधिकृत दोन उमेदवारांसह एक अतिरिक्त अर्ज भरला आहे. त्यामुळे 10 जागांसाठी 13 अर्ज असून सोमवारी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांचा अर्ज मागे घेतला जाऊ शकतो.
भाजपने राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला अस्मान दाखविले. या विजयामुळे विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पारडे जड मानले जात आहे. भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची बेगमी करावी लागणार आहे. असे असताना भाजपने खोत यांची उमेदवारी कायम ठेवली तर निवडणूक अत्यंत चुरशीची होईल. विधान परिषद निवडणुकीतील मतदान गुप्त असते. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीचे मतदान लक्षात विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होऊन त्याचा फटका सत्ताधारी आघाडीला बसू शकतो.
छोटे पक्ष आणि अपक्षांना महत्व
राज्यसभेच्या सहाव्या जागेचा विजय छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांनी निश्चित केला. राज्यसभा निवडणुकीत त्यांचे मतदान निर्णायक ठरले. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक घ्यावी लागली तर छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मतांचे महत्व अतोनात वाढणार आहे. निवडणूक अटळ असल्याचे गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांनी मतांची बेगमी करायला सुरुवात केली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल अर्ज
भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड आणि पुरस्कृत सदाभाऊ खोत
राष्ट्रवादी कॉंग्रेस : रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवाजीराव गर्जे
शिवसेना : सचिन अहिर, आमशा पाडवी
कॉंग्रेस : चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप