मुंबई: भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने मंडळाचे कामकाज पाहण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रशासक समितीचा कार्यकाल संपला असून यापुढे मंडळाचे सर्व कामकाज निवडून आलेली समिती पाहील.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याबरोबर कामाला सुरुवात करावी, अशी स्पष्ट सूचना
सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने केलेल्या सूचनांप्रमाणे आता ही समिती मंडळाचे काम पाहील. भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विनोद राय यांच्या नेतृत्वात ही प्रशासकीय समिती गेल्या 33 महिन्यांपासून मंडळाचे कामकाज पाहात होती.
2013 साली आयपीएल स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या आरोपांनंतर सर्वोच्च न्यायालयाला मंडळाच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालावे लागले होते. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या मंडळातील कामकाजात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचार संपावा, यासह अनेक सुधारणा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 2015 साली न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वात एका समितीची स्थापना केली होती.
समितीने न्यायालयाकडे अहवाल सादर केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी प्रशासकीय समितीची स्थापना केली होती.