चिंबळी – करोनाच्या भीषण संकटात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय आणि परजिल्ह्यातील नागरिकांना आपल्या गावी परतेपर्यंत मायेचे चार घास भरविणाऱ्या चिंबळी (ता. खेड) येथील ग्रामस्थांचे परप्रांतीयांनी खुल्या मनाने आभार मानले आहेत. जवळपास महिनाभर या गरजू नागरिकांना जेवण पुरवत त्यांच्या पोटाची भूक भागवण्याचे काम चिंबळी ग्रामस्थांनी केले आहे.
खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या अन्नछत्र उपक्रमाचा परप्रांतीय व परजिल्ह्यातील नागरिक त्यांच्या गावी परतल्यानंतर समारोप करण्यात आला. यासाठी गावातील हनुमान तरुण मंडळाने पुढाकार घेतला होता. या उपक्रमासाठी बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे यांचे सहकार्य लाभले.