पाणी काढण्याचा प्रयत्न
मधुबन, जयमालानगर या परिसरातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये अद्यापही सखल भागात पाणी साचून राहिले आहे. हे पाणी काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनाच प्रयत्न करावे लागत आहे. घरातील स्वच्छतेसोबतच बाहेरील पाणी काढणे गरजेचे असल्याने दोन्ही ठिकाणी नागरिकांचा संघर्ष सुरू आहे. वेगवेगळ्या युक्त्या लढवून घरासमोर आणि सोसायट्यांमध्ये साचलेले पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पिंपरी – सलग चार दिवस मावळासह पिंपरी-चिंचवड शहरात पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र आज (मंगळवारी) पावसाने विश्रांती घेतल्याने तसेच धरणांमधून सोडण्यात येणारा प्रवाहही कमी झाल्याने जनजीवन काही प्रमाणात सुरळीत झाले असून स्थलांतरीत झालेल्या नागरिकांनी आज पुन्हा आपले घर गाठले. पूर ओसरला असला तरी परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पूरग्रस्तांचा आज दिवसभर संघर्ष सुरू होता.
चार दिवसांच्या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा आणि पवना नदीला पूर आला होता. मुळा नदीमुळे वाकड, हिंजवडी, सांगवी, पिंपळे गुरव परिसराला फटका बसला होता. तर पवना नदीच्या पुरामुळे थेरगाव, पिंपरी, कासारवाडी, दापोडी, बोपोडी, फुगेवाडी परिसरातील नदीकाठच्या रहिवाशांना स्थलांतरीत व्हावे लागले होते. गेल्या चार दिवसांत झालेल्या दिवसरात्र पावसामुळे नदीकाठच्या झोपडपट्ट्यांसह सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे शहरातील हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले होते.
मंगळवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दोन्ही नद्यांचा पूर काही प्रमाणात ओसरला. पाणी कमी झाल्याचे लक्षात येताच स्थलांतरित नागरिकांनी आपआपल्या घराकडे धाव घेतली. घरात साचलेला गाळ, पावसात वाहून गेलेले साहित्य यामुळे अनेकांना अश्रु अनावर झाले होते. अनेकांचा संपूर्ण संसारच वाहून गेला होता. उरले-सुरले साहित्य जागेवर लावण्याबरोबरच घराची व परिसरातील स्वच्छता करण्यातच बहुतेकांनी दिवस घालविला.
पूराशी सामना केल्यानंतर आज दिवसभर पूराचा फटका बसलेल्या नागरिकांचा संसार जागेवर आणण्यासाठी संघर्ष सुरू होता. घरातील संसारपयोगी साहित्य, कपडे, टीव्ही, फ्रीजसह अनेक वस्तूंना पुराचा फटका बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे पहावयास मिळाले. एकमेकांना धीर देत पुन्हा नव्याने संसार उभारण्याची धडपड सुरू होती. पूर ओसरला असला तरी रहिवाशांचा संघर्ष मात्र आज दिवसभरही कायमच असल्याचे पहावयास मिळाले.
सुमारे 30 साप वाचविले
पुराच्या पाण्याने सर्पांचे देखील जीवन धोक्यात आले होते. आपल्या घरात पाणी शिरलेले असतानाही सांगवी परिसरातील सर्पमित्र या सापांना वाचविण्यासाठी झटत होते. वन्य जीव सामाजिक संस्थेचे सरचिटणीस विनायक बडदे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले सुमारे आठ सर्पमित्र आपल्या घरातील परिस्थितीची चिंता सोडून सर्प वाचविण्यासाठी झटत होते. पुराचे पाणी ओसरल्यानंतर ठिकठिकाणी जखमी अवस्थेत साप आढळून येत होते. सर्पमित्रांनी तीस सापांचे प्राण वाचवून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडले. यात प्रामुख्याने घोणस, नाग, नागाची पिल्ले, मण्यार असे सर्प होते. पुराच्या पाण्यात आठ ते दहा सर्पांचा मृत्यू झाला. यात कवड्या, कवड्याची पिल्ले, मण्यार आणि धामण या सर्पांचा पुरामळे मृत्यू झाला.
वाहून गेल्या दुचाकी
सांगवी परिसरात पुराचे पाणी ओसरल्यानंतर अनेक नागरिकांना आपल्या दुचाकी सापडल्या नाहीत. पवनानगर परिसरात मात्र कित्येक दुचाकी वाहून येऊन पडल्या होत्या. पावसाच्या पाण्याने अनेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले होते. पावसाच्या प्रवाहासोबत वाहून आलेल्या दुचाकी तर खूपच क्षतिग्रस्त झाल्या होत्या. ज्यांनी आपल्या दुचाकी वाचविल्या होत्या. त्यांच्या दुचाकीच देखील नादुरुस्त झाल्या होत्या. सायलन्सरमधील पाणी काढून, प्लग साफ करुन दुचाकी पुन्हा सुरू करण्याची मोठी कवायत नागरीक करत होते. पुराच्या पाण्याने झालेल्या इतर नुकसानासोबत दुचाकीचे मोठे नुकसान झाल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला.
सफाईचे मोठे आव्हान
पवनानगर, प्रियदर्शनीनगर, जयमालानगर, मधुबन सोसायटी या परिसरांमध्ये मंगळवारी सकाळी पाणी ओसरण्यास सुरुवात झाली होती. तब्बल 48 तास पाण्यात राहिलेल्या घरात आणि घराच्या आसपासच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात चिखल आणि भिजलेला कचरा जमा झाला होता. ज्या वस्तू कधी उपयोगी वाटत होत्या, त्या वस्तू देखील पुराच्या पाण्याने कचरा झाल्या होत्या. घरातून हा कचरा बाहेर काढणे, चिखलाने बरबटलेल्या भिंती आणि फरशी साफ करणे नागरिकांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. येत्या दोन दिवसात सर्व घरातील भिजलेला आणि पाण्यामुळे कुजलेला कचरा मोठ्या प्रमाणात बाहेर येईल आणि या कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे पालिका प्रशासनासमोर देखील मोठे आव्हान ठरणार आहे. तसेच नागरिकांना आपल्या घरासमोरचा चिखल आणि पाणी काढण्याची वेळ देखील आली होती.
झोपडपट्ट्यांमध्ये अजूनही संघर्ष
मुळानगर परिसरात अद्यापही झोपडपट्ट्यांमधील सर्व पाणी ओसरलेले नसल्याने पुराच्या पाण्यातच झोपडपट्टीवासियांचा जगण्याचा संघर्ष सुरू असताना दिसत आहे. गुडघ्याएवढ्या पाण्यात दैनंदिन कामे केली जात असल्याचे भीषण चित्र दिसत आहे. या परिसरात पाणी ओसरावे किंवा पाणी पुढे ढकलता यावे, यासाठी नागरिकांकडूनच प्रयत्न होताना दिसत आहेत. परंतु पुराच्या या पाण्यासमोर नागरिकांचे प्रयत्न अतिशय तोकडे पडत आहेत. सखल भागात झोपडपट्टी असल्यामुळे पाणी साचून राहिले आहे. हे पाणी बाहेर काढणे देखील जिकरीचे काम ठरत आहे.