मुंबई – ठाकरे गटाने तपास यंत्रणांच्या कारवायांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. तब्बल पाचशे कोटींचा घोटाळा साखर कारखान्यामध्ये झाला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. यावर आता आमदार राहुल कुल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे सर्व आरोप राजकीय हेतून केले असल्याचे कुल यावेळी म्हणालेत.
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधत राहुल कुल यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर भाष्य केले. “संजय राऊत यांनी नैराश्यातून अपुऱ्या माहितीच्या आधारे हे आरोप केले आहेत. मी वीस ते बावीस वर्षांपासून कारखाण्याचा अध्यक्ष आहे. कारखाना पूर्णतः सुरक्षित ठेवण्याचे काम आम्ही करत आहोत. राऊतांनी केलेले हे आरोप पूर्णतः राजकीय आहेत” असं कुल यावेळी बोलताना म्हणाले.तसेच हे आरोप नेमकं आत्ताच का झाले हे समजून घेणं गरजेचं असल्याचं देखील कुल यावेळी म्हणाले.
संजय राऊत यांनी ट्विट करत पाचशे कोटींच्या भ्रष्टाचाराचे केले आरोप
“देवेंद्रजी भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसते.500 कोटीचा मनी लॉण्डरिंग व्यवहार आहे. निःपक्ष चौकशीची आपल्याकडून अपेक्षा आहे” अशा आशयाचा मजकूर लिहीत राऊत यांनी फडणवीस यांना लिहिलेले पत्र ट्विट केले आहे. यासोबतच राऊत यांनी या कारखान्यातील संचालक मंडळाची यादी देखील जाहीर केली आहे.