भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 या आघाडीसह मालिकाही सुरक्षित केली. मात्र, या विजयानंतरही संघातील प्रत्येक खेळाडूने विशेषतः पहिल्या चार फलंदाजांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. विराट कोहली, लोकेश राहुल व कर्णधार रोहित शर्मा यांनी थोडीतरी लाज राखावी. ज्या देशाने जगाला सर्वोत्तम फिरकी गोलंदाज दिले, त्याच देशाचे फलंदाज अननुभवी फिरकी गोलंदाजीसमोर आट्यापाट्या खेळताना दिसतात, तेव्हा मानसिक त्रास होतो.
ऑस्ट्रेलिया संघात एकमेव अनुभवी नाथम लॉयन व नवखा टॉड मर्फी हे फिरकी गोलंदाज आहेत. त्यांच्यासमोर ज्या पद्धतीने आपले फलंदाज नांगी टाकत आहेत ते पाहता असेच वाटते की टी-20 क्रिकेटमुळे क्रिकेटचे तंत्र किती चुकत आहे. त्यातही सध्या संघात असलेल्या खेळाडूंची देहबोली पाहता त्यांना बहुतेक आता कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छाच नसल्याचे जाणवते. कोहली तर गेल्या तीन वर्षांत अत्यंत सुमार फिरकी गोलंदाजांना विकेट बहाल करत आहे. रोहित शर्माला शिक्षा म्हणून पुढील दोन्ही कसोटींतून विश्रांती दिली गेली पाहिजे. कसोटी क्रिकेटमध्ये भरपूर वेळ असतानाही जर रोहितसारखा फलंदाज स्थिरावल्यावरही धावबाद होत असेल तर त्याला खडेबोल सुनावले गेलेच पाहिजेत.
राहुलबाबत काही बोलण्यासारखे नसल्याने काय बोलावे, हा प्रश्नच आहे. त्याचे दुसऱ्या डावात शतक केवळ 99 धावांनी हुकले असे म्हणावे का? अतिशयोक्ती सोडा, मात्र त्याला आता पुढील दोन्ही कसोटीत जर संघात ठेवले तर त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा रोहित, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, बीसीसीआय व डोके नसलेली निवड समिती (डोके म्हणजे अध्यक्ष नसलेली असा अर्थ आहे) यांना झाली पाहिजे.
आपण हा सामना जिंकलो ते पहिल्या डावात अक्सर पटेल व रविचंद्रन अश्विनने केलेल्या धावांमुळे, तसेच दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची वाताहत केलेल्या रवींद्र जडेजामुळे, तसेच भारताच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारासह श्रीकर भरतने केलेल्या जबाबदारीच्या खेळीमुळे. ज्या खेळपट्टीवर भरत किंवा पटेलसारखे नवखे फलंदाज धावा करू शकतात, मग रोहित, राहुल व कोहलीने का केल्या नाहीत. कोणत्या निकषावर त्यांना प्रमुख फलंदाज म्हणायचे. संघात सूर्यकुमार यादव असतानाही जर श्रेयस अय्यरला संधी दिली जात असेल तर त्यामागचा हेतूही तपासला गेला पाहिजे.
असो, काय आणि किती बोलणार. पण जर भारतीय संघाला कसोटी क्रिकेट खेळायचे असेल व त्यावर दबदबा निर्माण करायचा असेल तर ठिगळे जोडून म्हणजे रोटेशन करून काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागतील. आता पुढील दोन कसोटीत तरी सोकॉल्ड प्रमुख फलंदाजांनी आत्मपरीक्षण करत कामगिरी करावी, हीच अपेक्षा आहे.