आठवणीतल्या निवडणूका…
1978 सालची निवडणुक म्हणजे स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाई नंतरची लढाई असे म्हटल्यास अजिबातच वावगे ठरणार नाही.आणीबाणी नंतरच्या या निवडणुकीच्या वेळी जनता पक्षाची लाट सबंध देशभर होती हे नाकारता येणार नाही. देशात आणि राज्यात नवक्रांतीचे वारे वहात होते. मोठ्यामोठ्या मिरवणुका मोठ्या वक्त्यांच्या सभा अशा सगळ्या विशिष्ट विचारांनी भारलेली ही निवडणुक होती.
या निवडणुकीपूर्वी जवळ -जवळ 19 महिने देशातील अनेक मातब्बर पुढारी स्थानबद्धतेत होते . वर्तमानपत्रांवर सेन्सॉरशिप लावलेली होती. त्यानंतर लगेचच या निवडणुका असल्याने या निवडणुकीत विचारांची पखरण होणारच होती. त्याकाळात एस एम .जोशी,ना ग.गोरे यांच्या सभांना मोठी गर्दी जमायची सभेपूर्वी या नेत्यांच्या मोठ्या शोभायात्रा निघायच्या. या शोभायात्रांनी वातवरण बदलून जायचं. त्यानंतर वक्त्यांची वैचारीक भाषणे म्हणजे मेजवानी असायची .बहुतांश सभा या माळीवाडा वेशी जवळ आणि गांधी मैदानात व्हायच्या. आणीबाणी नंतर सर्वच पक्षांचे ध्रुवीकरण झाले होते. त्यामुळे सताधारी कॉंग्रेसचा एकमेव बलाढ्य शत्रू अशी प्रतिमा असलेला पक्ष म्हणून जनता पक्षाकडे पाहिले जायचे.
हा काळ जसा सभा मिरवणुकांचा होता तसाच तो घोषणांचाही होता त्याकाळात नसबंदी के तीन दलाल इंदिरा संजय बन्सीलाल या घोषणे बरोबरच गरीबांचा कैवारी नांगरधारी शेतकरी आणि आमचा पक्ष जनता पक्ष या सारख्या साध्या सुटसुटीत घोषणा ज्याच्या त्याच्या तोंडी ऐकूू यायच्या. मात्र जनतेला भुरळ पडली ती सत्तेवर आल्यास दोन रुपये किलो साखर देणार असल्याच्या जाहिरनाम्यातील घोषणेचा.
जनतापक्षाकडून डॉ.कुमार सप्तर्षी यांना निवडणुकीचे तिकीट मिळाल्याने त्यांनी पक्षाच्या लाटेचा फायदा उचलत प्रचार केला .मात्र तरी डॉ.सप्तर्षीचा निसटता विजय झाला या निवडणुकीत डॉ.सप्तर्षींना 19039 मते मिळाकी तर त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ.ना.ज. पाउलबुद्धे यांना 18691 मते पडली तर नवनीतभाई बार्शिकरांना 14 368 आणि कॉंग्रेसच्या विभाजना नंतर अस्तित्वात आलेल्या कॉंग्रेस आय च्या प्रा. बेडेकरांना 9509 इतकी मतं मिळाली. या व्यतिरीक्त आणखीन चार उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीतील नवनीतभाई बार्शिकरांचा पराभव अनेकांना चुटपुट लावून गेला.कारण मागच्या निवडणूकीत दिलेली बहुतेक आस्वासने त्यांनी पाळली होती तरीही त्यांचा पराभव झाला.