नवी दिल्ली : चीनमध्ये करोनाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातल्यानंतर आता संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. दरम्यान, एम्सचे माजी संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी जानेवारीच्या पहिल्या १४ दिवासंमध्ये देशातील करोनाच्या स्थितीवरुन परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येईल असे म्हटले आहे.
एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. चीनमध्ये करोनाचा नवा व्हेरियंट BF.7 आढळला असून रुग्णसंख्या वाढली आहे. भारतात करोनाची लाट येण्याच्या शक्यतेबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले “देशात करोनाची नेमकी काय स्थिती असेल याचा अंदाज घेण्यासाठी जानेवारी महिन्यातील पहिले १४ दिवस महत्त्वाचे असतील. लोक प्रवासात असून पुन्हा परतत असल्याने हा कार्यकाळ महत्त्वाचा असेल”.असे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना, “लोक प्रवास करुन परत आल्यानंतर पाच ते सात दिवसांचा कार्यकाळ लक्षणीय असतो. प्रवासात संसर्ग होण्याची भीती असल्याने यानंतर देशातील करोना रुग्णांची संख्या वाढत आहे की नाही याचा अंदाज येईल,” असे डॉक्टर गुलेरिया म्हणाले आहेत. तसेच करोनास्थितीवर नजर ठेवण्याची गरज आहे असा सल्ला देताना गुलेरिया यांनी २०१९ मधील घटनाक्रम सांगितला. “चीनमधील नववर्षामुळे याची सुरुवात झाली होती. संसर्ग झालेले वुहानमधील अनेकजण इटली आणि युरोपमध्ये प्रवास करत होते. यानंतर युरोपमध्ये आणि खासकरुन इटलीत अचानक रुग्णवाढ झाली होती. याचा परिणाम पुढील अनेक महिने, आठवडे दिसत होता,” असे देखील त्यांनी म्हटले.
दरम्यान गुलेरिया यांनी लसीकरण झालेले लोक प्रवास करु शकतात असे सांगताना करोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. “ज्यांनी बुस्टर डोस घेतलेला नाही, त्यांनी आता तो घेतला पाहिजे,” असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.