मुंबई -लखनौ सुपर जायंट्स व रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात घडलेल्या गैरवर्तनाला जे जबाबदार ठरले त्या विराट कोहली, गौतम गंभीर व नवीन उल हक यांना जरी बीसीसीआयने दंड केला असला तरीही तो त्यांच्या खिशातून जाणार नाही. या खेळाडूंना लावण्यात आलेला आर्थिक दंड त्या खेळाडूंचे संघ मालक भरणार आहेत. त्यामुळे ना खेळाडूंच्या खिशाला ताण पडला आहे, ना आता त्यांच्यावर कोणतीही जरब नसल्याने आपण कसे वागलो याची शरमही दिसणार नाही.
शिक्षा काय असते हे एकदा लक्षात आले की व्यक्ती निगरगट्ट बनतो. तेच या खेळाडूंच्या वर्तनावरून आता पुढील सामन्यांतही दिसून येणार आहे. स्वभाव आक्रमक आहे या नावाखाली आपण आता कसेही वागलो तरीही आपली काळजी घ्यायला व जबर दंडाची रक्कम भरायला आपले संघ मालक बसलेलेच आहेत, असा नवा पायंडा आता पडला आहे.
बंगळुरू व लखनौ यांच्यात झालेल्या सामन्यात विराट कोहलीची लखनौचा प्रशिक्षक गौतम गंभीर व खेळाडू नवीन उल हक यांच्याशी शाब्दिक चकमक उडाली होती. तसेच हे खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावूनही गेले होते. या घटनेची गंभीर दखल बीसीसीआयने घेतली व या खेळाडूंना जबर दंडही ठोठावला.
कोहलीला जवळपास 1 कोटी, गंभीरला 50 लाख व नवीनला पावणेदोन लाख रुपये दंड करण्यात आला. यामुळे यापुढे हे खेळाडू तसेच नवोदितांसह अन्य खेळाडूही जपून वागतील, असा बीसीसीआयचा कयास होता. मात्र, त्यांचा दंड त्यांच्या संघ मालकांनी भरल्यामुळे बीसीसीसआयच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला आहे.
खेळ भावनाच महत्त्वाची
भारताच्याच नव्हे तर अनेक देशांतील आजीच माजी क्रिकेटपटूंनी या घटनेचा निषेध केला आहे. तसेच केवळ आर्थिक दंड केल्यानंतर खेळाडूंवर जरब बसेल असे आपल्याला वाटत नसल्याचे खुद्द विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी म्हटले होते. आता त्याला अनेक खेळाडूंनी दुजोरा दिला आहे. खेळभावना अन्य कोणत्याही गोष्टीसाठी महत्त्वाची असून, अशा घटना याच खेळभावनेला काळिमा फासतात, असेही सोशल मीडियावर चाहत्यांनी म्हटले आहे.