अहमदाबाद – इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पाचवा व अखेरचा सामना आज होत आहे. या सामन्यात विजय मिळवत कसोटी मालिकेपाठोपाठ टी-20 मालिका जिंकण्यासाठीही विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज बनला आहे.
या मालिकेतील पहिले चारही सामने दोन्ही संघांच्या फलंदाज व गोलंदाजांची कसोटी पाहणारे ठरले. चौथ्या सामन्यात तर भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारूनही इंग्लंडने चांगलाच पाठलाग केला होता. शार्दुल ठाकूरने मोक्याच्या क्षणी घेतलेल्या दोन बळींमुळे सामना भारताला जिंकता आला अन्यथा 185 धावा करुनही भारताच्या पदरी निराशाच पडली असती. या सामन्यात मुंबईकर खेळाडूंचे वर्चस्व राहिले. सूर्यकुमार यादवने अफलातून खेळी केली तर ठाकूरने अफलातून गोलंदाजी केली.
यादवच्या फलंदाजीने समाधानकारक धावा उभारता आल्या असल्या तरीही प्रमुख फलंदाजांचे अपयश कायम राहिले. त्यातही दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यात तडफदार खेळी केलेल्या कर्णधार कोहलीच्या अपयशावरही टीका झाली. त्यातच सलामीवीर रोहित शर्मा व लोकेश राहुल यांना सातत्याने येत असलेले अपयशही भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेपासून भरात असलेल्या ऋषभ पंतकडून सुरूवात चांगली होत असली तरी त्याला मोठी खेळी करता येत नसल्याने भारतीय संघाच्या चिंतेत भर पडत आहे.
गोलंदाजीत सातत्याने प्रयोग केल्यामुळे भुवनेश्वर कुमार वगळता अन्य एकाही गोलंदाजाला या मालिकेत स्थिरावता आलेले नाही. भुवनेश्वर सोडला तर संघातील अन्य गोलंदाजांना आयपीएलमधील कामगिरीनंतरही आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांचा फारसा अनुभव नाही. तेच चौथ्या सामन्यात दिसून आले. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो व अष्टपैलु बेन स्टोक्स यांना कसे रोखायचे हेच भारतीय गोलंदाजांना समजत नव्हते. ठाकूरच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात ते बाद झाले नसते तर भारताचा हातात असलेला सामना निसटला असता. हार्दिक पंड्याला फलंदाजीत वारंवार अपयश येत आहे.
जी भूमिका बेन स्टोक्स इंग्लंडसाठी निभावत आहे तिथेच पंड्या भारतासाठी करु शकलेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे कसोटीत भारतीय फलंदाजी थेट आठव्या क्रमांकापर्यंत होती मात्र, टी-20 संघात सहाव्या क्रमांकानंतर शेपूट सुरू होत आहे. ही मालिका पार पडल्यावर लगेचच एकदिवसीय तीन सामन्यांची मालिका होणार आहे. त्यासाठी या सामन्यातील विजय भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे.
तेवतिया व इशानला संधी मिळणार का?
दुखापतीचे कारण देत संघाबाहेर ठेवलेल्या सलामीवीर इशान किशनचा अखेरच्या सामन्यासाठी संघात समावेश होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच आक्रमक फलंदाज राहूल तेवतिया यालाही या सामन्याद्वारे पदार्पण करण्याची संधी मिळेल का याचीही उत्सूकता आहे.
नवोदितांना जास्त संधी द्या – गंभीर
मुंबईच्या सूर्यकुमार यादवला एका सामन्यात संधी दिल्यावर नंतर लगेचच त्याला संघातून वगळले गेले. या निर्णयामागे नक्की काय विचार होता, हे भारतीय संघाचा कर्णधार या नात्याने विराट कोहलीने सांगावे. जर प्रमुख फलंदाज अपयशी ठरत असतील तर नवोदितांना जास्ती जास्त संधी दिली गेली पाहिजे, असे परखड मत माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे. कोहली प्रत्येक वेळेला विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघबांधणी सुरू असल्याचे सांगत आहे. मात्र, नवोदित खेळाडूंना एखाद्याच सामन्यात खेळवले जाते व नंतर लगेचच वगळण्यातही येते. असेच सुरु राहिले तर त्यांना प्रत्यक्ष सामना खेळण्याचा अनुभव कसा मिळेल. त्यांना जर संघात निवडले गेले तर त्यांना जास्त संधीही दिली गेली पाहिजे, असेही गंभीर म्हणाला.