– अमित डोंगरे
भारतात येत्या ऑक्टोबर महिन्यात होत असलेल्या विश्वकरंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी सध्या भारतीय संघाची बांधणी सुरू असल्याच्या नावाखाली काय वाट्टेल ते निर्णय घेतले जात आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत सलामीवीराच्या भूमिकेत नवोदित इशान किशनने भरीव कामगिरी करुनही त्याला चौथ्या सामन्यासाठी संघातून वगळले गेले. याचे कर्णधार विराट कोहलीने समर्थनही केले. याचेच आश्चर्य वाटत आहे.
संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार कोहली व निवड समितीचे थिंक टॅंक एकूणच इंग्लंडविरुद्धच्या सपूर्ण दौऱ्यात जे निर्णय घेत आहेत ते अनाकलनीय ठरले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये आपण विजेते ठरलो त्यामुळे त्यावरून वादळ निर्माण झाले नाही. पण टी-20 सामन्यांच्या मालिकेत संघबदल करताना कोहलीने ज्यांना संधी दिली ते म्हणजे वाटाण्याच्या अक्षता म्हणण्या पलीकडे काहीच नव्हते.
पहिल्या दोन सामन्यात हिटमॅन रोहित शर्माला संघाबाहेर ठेवले गेले व कारण दिले गेले की विश्वकरंडकाच्या तयारीच्या दृष्टीने नवोदितांना जास्तीत जास्त संधी देण्याचा हेतू आहे. नंतर संघातून नवोदितांनाच गायब केले व रोहितला संघात घेतले तेव्हा कारण दिले की इंग्लंडविरुद्धची ही मालिका जिंकणे महत्त्वाचे असून त्यासाठी संघात अनुभवी खेळाडू घेतलेच पाहिजेत.
त्यातही दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी काही क्षण सूर्यकुमार यादवला पदार्पणाची संधी दिली गेली. तेव्हा कारण दिले गेले त्याने देशांतर्गत स्पर्धेत अतुलनिय कामगिरी केली असून त्याच्या भरात असण्याचा संघाला या मालिकेत लाभ होईल. पण त्याला सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करायला लावले व फलंदाजीलाही त्याच्या ठरलेल्या क्रमांकावर पाठवले गेले नाही.
बरे हे झाले एकीकडे तर दुसरीकडे तिसरा सामना सुरू होण्यापूर्वी सूर्यकुमारला संघातून बाहेर काढले आणि कारण दिले लोकेश राहूलला संधी दिली पाहिजे तो संघातील एक प्रमुख खेळाडू आहे. आता राहुलच्या बाबत बोलायचे तर त्याला सातत्याने अपयश येत आहे मग त्याला उलट देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळवले गेले पाहिजे होते.
असो, पहिल्या सामन्यात सलामीसाठी इशान किशनला संघात पदार्पणाची संधी देण्याच्या जागी शिखर धवनला घेतले गेले. त्याने व राहुलने संधी मिळाल्यावर काय दिवे लावले ते आपण पाहिलेच आहे. मग इशानने चांगली खेळी केल्यावरही त्याला चौथ्या सामन्यातून वगळले आणि सूर्यकुमारला पुन्हा एकदा संधी दिली. हे म्हणजे आम्ही काय निर्णय घेतो ते सामान्य माणसांना समजणारच नाहीत केवळ क्रिकेट समिक्षकांनाच समजतील अशी प्रतिक्रिया कोहलीसह संघव्यवस्थापन व निवड समितीकडूनही आली. त्यावर डोक्याला हात लावण्या व्यतिरिक्त आपण तरी काय करु शकतो.
येत्या ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत आहे व त्यासाठी हे असे अनाकलनीय निर्णय घेतले जात आहेत. हे म्हणजे असे झाले की निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला आहे मग काहीही निर्णय घेऊ आम्ही तुम्हाला उत्तर देण्यास बांधील नाही. खुद्द कर्णधार कोहलीदेखील चौथ्या सामन्यात ज्या पद्धतीने स्टेपआऊट होत आदील रशिदला फटकावण्याच्या प्रयत्नात बाद झाला ते पाहता खरोखरच शॉट सिलेक्शनबाबत बीसीसीआय व राहूल द्रविडने यांचे कान उपटले पाहिजेत.
ही निर्णय प्रक्रिया व अशी कामगिरी असेल तर विश्वकरंडकात होणारा पाणउतारा कोणीही रोखू शकणार नाही. एकूणच या प्रक्रियेमागचा विचार पाहिला तर असे विचारावेसे वाटते की संघ बांधणीच्या नावाखाली मनमानी सुरू आहे का?