केंदूर – चासकमानचे पाणी करंदी (ता. शिरूर) येथील धानोरे-कोरेगाव शाखेला पाणी सोडण्याचा निर्णय रात्रीतून बदलल्याने आपली फसवणूक झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चारीचे दरवाजे उघडून पाटबंधारे शाखेचा निषेध नोंदवला. यावेळी येथे पोलीस दाखल झाल्याने शेतकरी अधिकच आक्रमक होत पोलिसांसमवेत त्यांची बाचाबाची झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर अधिकाऱ्यांनी पुन्हा आश्वासन देत या शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असला तरी याचा पुन्हा स्फोट होण्याची शक्यता अधिक आहे.
चासकमानच्या पाण्यासाठी शिरूर तालुक्यातील पश्चिम आणि पूर्व भागातील शेतकऱ्यांचा संघर्ष गेल्या आठवड्यापासून सुरुच आहे. त्याच पार्श्वभूमीवर जातेगाव, पिंपळे जगताप, करंदी भागातील शेतकरी बुधवारी (दि. 6) चक्री उपोषणास बसले होते. तर रविवारी (दि. 10) पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन पाटबंधारे विभागाने दिल्याने गुरुवारी (दि. 7) उपोषण सोडले होते; मात्र पाटबंधारे विभागाने शनिवारी (दि. 9) आश्वासनाची पूर्तता होणार नाही, असे सांगितल्याने आपली फसवणूक झाल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी चास कमानच्या पाण्यावर ताबा घेत चारीचा दरवाजा उघडा करून पाणी सुरू केले.
याबाबत माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सोबत तीन अधिकारी आणि 15 पोलीस कर्मचारी घेऊन घटनास्थळी आले. चासकमानच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने चारीचे दरवाजे पुन्हा बंद केले. दरम्यान, शेतकऱ्यांना तेथून जाण्यास पोलिसांनी विनंती केली; मात्र पाणी अधिकृत मिळेपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यानंतर मोठ्या संख्येने महिला जमा झाल्याने परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाऊ शकते, असा अंदाज बांधून पोलिसांनी राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या त्या ठिकाणी पाचारण करण्यात आल्या. शेवटी शेतकरी आणि चासकमानच्या अधिकाऱ्यांशी चर्चा घडवण्यात आली.
कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून पाणी गुरुवारी (दि. 21) मिळणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, संतप्त शेतकऱ्यांनी हा निर्णय मान्य केला नाही. त्यानंतर चास कमानचे अधिकारी प्रेमनाथ शिंदे, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, उपनिरीक्षक राजेश माळी, महेंद्र गायकवाड, किरण भालेकर, प्रवीण साळुंके, ब्रह्मा पवार यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून मध्यस्ती केली. अखेर पर्यायी व्यवस्था म्हणून कालव्यावर सुरू असलेले सर्व वीज पंप आणि छोटी मोठी गळती थांबवून वाढलेले पाणी 48 तासांनंतर कोरेगाव-धानोरे शाखेला देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुन्हा आश्वासनावर बोळवण
गळती थांबवण्यात पाटबंधारे विभागाला यश येणार का? आणि हा निर्णय किती प्रभावी ठरेल याची खात्री नाही; परंतु तूर्तास तरी शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नसल्याने काही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठोस उपाययोजना न झाल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला अधिकाऱ्यांनी पाने पुसण्याचेच काम केले असल्याने चासकमान प्रशासनावर शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.