बारामती -माळेगाव सहकारी साखर कारखानचे विस्तारीकरण झाल्यावर इतर कारखान्यांची कोंडी होईल, ही भीती विरोधकांना होती. कारखान्याचे विस्तारीकरणास न्यायालयात जाऊन विरोधकांनी विरोध केला; पण तेथेही विरोधकांची याचिका फेटाळण्यात आली. विरोधकांच्या भूलथापांना तुम्ही बळी पडल्यास तर काळ तुम्हाला माफ करणार नाही. विस्तारीकरण केल्यावर विरोधकांच्या पोटात का गोळा उठला, असा सवाल ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी उपस्थित केला आहे.
माळेगाव येथे सहकार बचाव पॅनलच्या प्रचारसभेत तावरे बोलत होते. ते म्हणाले की, विरोधकांच्या ताब्यात असणाऱ्या सोमेश्वर कारखान्याने 3 हजार टन प्रतिदिन असणारी गाळपक्षमता 6 हजार टन प्रतिदिन केली. त्याचप्रमाणे भवानीनगर येथील छत्रपती कारखान्याने 4 हजार टन गाळपावरून 8 टन, अंबालिकाने 8009 मेट्रीक टनाहून 12 हजार मेट्रीक टन, बारामती ऍग्रोने 3 हजारांहून 10 हजार मेट्रीक टन तर शरयू कारखान्याने 2500हून 8 हजार मेट्रीक टन क्षमता वाढविली.
तर मग माळेगावच्या विस्तारीकरणास विरोध का? “माळेगाव’ने 4 हजारांहून 7500 मेट्रीक टन केल्याचे चंद्रराव तावरे यांनी यांनी सांगितले. छत्रपती कारखान्याची सध्याची अवस्था कोणी केली, त्यांना चारवेळा अध्यक्ष का बदलावे लागले. सहकारी साखर कारखाने मोडीत काढून खासगी कारखाने चालविण्याचा डाव नेत्यांनी रचलेला आहे. सहकारी कारखान्यांना अडचणीत आणण्याचे पाप राज्याचे नेते करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यांना नेत्यांची काळजी घ्यावी वाटते -रंजन तावरे
आमच्या अगोदरच्या संचालक मंडळाने एक वीट देखील लावली नाही. काही काम करायचे नाही, पण आम्ही काही करायचे म्हटले की, यांच्या नेत्यांच्या आदेशावरून आडकाठी आणतात. यांना सभासदांची काळजी नाही. यांना नेत्यांची काळजी घ्यावी वाटते. कारखान्यावर 400 कोटींचे नाहीतर फक्त 85 कोटींचे कर्ज आहे. आपल्या काळात कारखान्याचे विस्तारीकरण केले. नवीन डिस्टलरी उभी केली.
इथेनॉल प्लॅंट, नवीन साडेतीन लाख टन साखर पोत्यांचे गोडावून बांधले. माळेगाव कारखान्याचे उच्चांकी असा 3400 रुपये दर दिला. एवढा भाव गोरगरीब शेतकऱ्याला दिल्याने नेत्यांचा तिळपापड झाला. ऊस उत्पादक सभासदांना त्यांच्या घामाचा जास्तीचा दाम कसा मिळेल, याबाबत सातत्याने आम्ही प्रयत्न करतो, आहे, अशी माहिती माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी दिली.