लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अवघे पुणे सज्ज
मानाच्या आणि प्रमुख मंडळांकडून प्रतिष्ठापना तयारी पूर्ण
पुणे – दोन वर्षांच्या “ब्रेक’ नंतर गणेश मंडळे उत्सवासाठी सज्ज झाले असून, शहरातील मानाच्या आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळांनीही यंदा बाप्पांच्या आगमानाची जय्यत तयारी केली आहे. करोना प्रादुर्भावामुळे पुढाकार घेऊन या मंडळांनी उत्सव साधेपणाने साजरा करण्याविषयी आवाहन करत स्वत:ही त्याचा अवलंब केला. मात्र, यंदा हा उत्सव बुधवारपासून (दि.31) दणक्यात साजरा केला जाणार आहे. दरम्यान, शहरात मानाच्या गणपतींची मिरवणूक प्रतिष्ठेची समजली जाते. पहिले पानाचे पाच आणि अन्य तीन मोठ्या मंडळाच्या गणेशाची प्रतिष्ठापना कोणत्यावेळी आणि कोणाच्या हस्ते केली जाणार आहे, याची माहिती “प्रभात’च्या वाचकांसाठी…
मानाचा पहिला : कसबा गणपती
प्रतिष्ठापना मुर्हूत : सकाळी 11.37
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांचा सन्मान म्हणून हुतात्मा राजगुरू यांच्या परिवाराच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. आजपर्यंत धार्मिक आणि अध्यात्मिक गुरूंनी प्रतिष्ठापना केली होती. पण, यंदा देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण म्हणून त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होईल. पारंपरिक चांदीच्या पालखीतून श्रींची मिरवणूक निघणार आहे. मूर्तीकार अभिजीत धोंडफळे यांच्या केईएम हॉस्पिटल येथील स्टुडिओमधून मूर्ती घेऊन मिरवणुकीला प्रारंभ होईल. या मिरवणुकीत श्रीराम पथक, वाद्यवृंद, प्रभात बॅंड, संघर्ष ढोल
पथक असणार.
मानाचा दुसरा : तांबडी जोगेश्वरी गणपती
प्रतिष्ठापना मुर्हूत : दुपारी 12.30 वाजता
मंडळाचे यंदा 130 वे वर्ष आहे. “श्रीं’चा आगमन सोहोळा पूर्वीप्रमाणे पारंपरिक पद्धतीत होणार आहे. आगमनाची मिरवणूक सकाळी ठीक 10.30 वाजता नारायण पेठेतील न. चिं. केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून सुरू होईल. चांदीच्या पालखीतून ही मिरवणूक कुंटे चौक, गणपती चौक मार्गे ती उत्सव मंडपात पोहोचेल. मिरवणुकीत आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅंन्ड, शिवमुद्रा ढोलताशा पथक, ताल पथक, विष्णूनाद शंख पथक, आम्ही गोंधळी – गोंधळी संबळ पथक असतील. श्रीं ची प्रतिष्ठापना कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे विश्वस्त मिलिंद काळे आणि पत्नी मीरा यांच्या हस्ते होणार असून, चांदीच्या देव्हाऱ्यात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल.
मानाचा तिसरा : गुरूजी तालीम मंडळ गणपती
प्रतिष्ठापना मुहूर्त : दुपारी 2 वा.10 मिनिटांनी
“पुण्याचा राजा’ गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना दुपारी 2 वा.10 मि. उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि पत्नी जान्हवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा वाजता गणपती चौकातून मिरवणुकीला सुरुवात होईल. सुभाष आणि स्वप्नील सरपाले यांनी बनवलेल्या आकर्षक फुलांच्या रथातून श्रींची मिरवणूक निघेल. ती गणपती चौकातून लिंबराज महाराज चौक पुढे अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक येथून गणपती चौकात मंडळाच्या मंडपात येईल आणि त्यानंतर प्रतिष्ठापना होईल. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारा वादन, अतुल बेहरे यांचे महिलांचे नादब्रह्म ढोल-ताशा पथक, गर्जना पथक, गुरुजी प्रतिष्ठान, श्री ढोल ताशा पथक येरवडा, समर्थ प्रतिष्ठान, नादब्रह्म ट्रस्ट पथक सहभागी असेल.
मानाचा चौथा : तुळशीबाग गणपती
प्रतिष्ठापना मुहूर्त : दुपारी 2 वा.30 मिनिटांनी
दुपारी अडीच वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि पत्नी जान्हवी यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. चिंतामणी जोशी गुरुजी, विलास कुलकर्णी गुरुजी हे पौरोहित्य करणार आहेत. सकाळी 11 वाजता श्रींची मिरवणूक निघणार आहे. ती गणपती चौक येथून निघून नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौक मार्गे बुधवार चौक तेथून समाधान चौक ते गणपती चौक अशी निघणार आहे. सरपाले बंधू यांनी साकारलेल्या स्वानंदलोक महालात श्रींची प्रतिष्ठापना होईल. या मिरवणुकीत शिवगर्जना ढोल-ताशा पथक, समर्थ प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक, उगम ही पथके सहभागी होणार आहेत. प्रतिष्ठापनेवेळी गणेश याग, बृहनस्पती याग, मंत्रजागर, असे धार्मिक विधी होणार असून, ते दहाही दिवस
चालणार आहेत.
पानाचा पाचवा : केसरीवाडा गणपती
प्रतिष्ठापना मुहूर्त : 12 वाजून 10 मिनिटांनी
मानाच्या पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीच्या प्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी साडेनऊ वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल. रमणबाग चौकातील गोखले यांच्याकडून श्रींची मूर्ती घेऊन ती पालखीतून केसरीवाड्यात वाजतगाजत मिरवणुकीतून आणली जाणार आहे. श्रीराम आणि शिवमुद्रा ढोल-ताशा पथके यामध्ये सहभागी होणार आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट,सुवर्णयुग तरुण मंडळ
प्रतिष्ठापना मुहूर्त : सकाळी 11 वा. 37 मिनिटांनी
यंदा उत्सवाचे 130 वे वर्ष असून, श्रींची मूर्ती पंचकेदारेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीमंध्ये विराजमान होणार आहे.गुजरातमधील गिरनार येथील गुरू दत्तात्रेय पीठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्रतिष्ठापना होणार आहे. सकाळी 8.30 वाजता मुख्य मंदिरापासून गरुड रथातून श्रींची मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी साकारलेले गरुड रथावर लावण्यात येणार आहेत. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बॅंड, प्रभात बॅंड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे.
अखिल मंडई मंडळ : श्री शारदा-गजानन
प्रतिष्ठापना मुहूर्त : दुपारी 12 वाजता
अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक फुलांनी सजलेल्या मंगल कलश रथातून सकाळी 9 वाजता निघणार आहे. मंगळवार पेठेतील श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख प्रताप गोगावले आणि पत्नी अपर्णा यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा होईल. प्रतिष्ठापनेपूर्वीची मिरवणूक शारदा गजानन मंदिरापासून मिरवणूक निघून मंडई पोलीस चौकी-रामेश्वर चौकापर्यंत जाऊन पुन्हा मंडई पोलीस चौकी मार्गे उत्सव मंडपात येणार आहे. रंगबेरंगी आरसे आणि झुंबराने सजलेल्या भव्य स्वप्नमहालात हलत्या झोपाळ्यावर शारदा गजानन विराजमान होणार आहेत.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव
प्रतिष्ठापना मुहूर्त : दुपारी 12 वा. 10 मिनिटांनी
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी सव्वानऊ वाजता श्रींची मिरवणूक भाऊसाहेबांची मूर्ती असलेल्या पालखीतून निघणार आहे. भाऊ रंगारी सभामंडपापासून ती जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक येथून मांडवापर्यंत निघेल. मिरवणुकीत सात पथकांची सलामी असणार आहे. श्रीराम, कलावंत, चेतक, वाद्यवृंद, अभेद्य, सामर्थ्य प्रतिष्ठान, पारंपरिक पद्धतीचा नगारावादन असणार आहे.
बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी दुपारी 1.54 पर्यंत मुहूर्त
पुणे – घरोघरी बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी बुधवारी (31 ऑगस्ट) ब्राह्ममुहूर्त पहाटे 4 वाजून 48 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 54 मिनिटांपर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मध्यान्हानंतर गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करता येऊ शकेल. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पहाटेच्या ब्राह्ममुहुर्तापासून ते दुपारी 1 वा. 54 मिनिटांपर्यंत प्रत्येकाला आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्यासाठी भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही, असे “दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी सांगितले.