उंब्रज – आगामी 2024 ची निवडणूक निर्णायक होणार असून देश कोठे जाणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. कॉंग्रेस पक्ष संपत चालला असून रोज एक नेता पक्ष सोडत आहे. भाजप पक्ष ताकदवान होत चालला असून येणाऱ्या काळात सर्व प्रादेशिक पक्ष संपणार असल्याचे विधान केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केले.
उंब्रज (ता. कराड) येथे भाजपच्यावतीने सातारा लोकसभा मतदारसंघांतील सहकारी संस्था पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, सातारा लोकसभेचे प्रभारी डॉ. अतुल भोसले, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, भरत पाटील, प्रभाकर साबळे, धैर्यशील कदम, कराड उत्तरचे तालुकाध्यक्ष महेशकुमार जाधव, रामकृष्ण वेताळ यांसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. सोम प्रकाश म्हणाले, “मला आनंद आहे आपण सहकाराशी जुळलेले आहात. येथील सहकारी संस्था कशा चालतात याचा अभ्यास करण्यासाठी इतर राज्यांतील लोक येत असतात व याचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला आहे.’ येथील सर्व उद्योजक, व्यावसायिकांचे विचार जाणून घेतले जाणार आहेत व त्याप्रमाणे कार्यवाही केली जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. पंतप्रधान मोदी यांनी आठ वर्षात भारताचा विकास साधला आहे. देशाला शक्तीशाली व विकसित राष्ट्र बणवण्याचा पंतप्रधान मोदी यांचा निर्धार आहे.
देशातील गोरगरीब जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. जगातील सर्वात प्रभावशाली नेता म्हणून पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाहिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. आ.जयकुमार गोरे म्हणाले, “तत्कालिन सहकार मंत्र्यांनी दमबाजीचे राजकारण केले होते. सत्तेचा दुरोपयोग केला जात होता. अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जेलमध्ये बसविण्याचे काम केले. येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत जिल्ह्याचा खासदार भाजपचा असणार आहे.’
दिवस बदलले आहेत. एकाही कार्यकर्त्यावर यापुढे अन्याय होणार नाही, असे त्यांनी सूचित केले. धैर्यशील कदम म्हणाले, “आ.शिवेंद्रसिंहराजे व डॉ. अतुल भोसले यांनी आमच्या पाठीवर हात ठेवला तर कराड उत्तर मतदारसंघात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही.’ गेल्या अडीच वर्षात खूप सोसावे लागले असून मंत्रिपदाचा त्रास झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमास उंब्रजसह परीसरातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक रामकृष्ण वेताळ यांनी केले. महेशकुमार जाधव यांनी आभार मानले.