सातारा -सहकारी ग्रामसेवक महिलेचा विनयभंग करुन तिला मारहाण केल्याच्या तक्रारीनंतर ताथवडा (ता. फलटण) गावचे ग्रामसेवक राजाराम शंकर ढोक यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची गंभीर दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली असून ढोक यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
मौजे गोळेवाडी (ता. फलटण) ग्रामपंचायत कार्यालयात दि. 22 रोजी राजाराम ढोक या ग्रामसेवकाने सहकारी ग्रामसेवक महिलेचा विनयभंग केला, तिचा मोबाइल जमिनीवर आपटून त्याचे नुकसान केले, याबाबत कोणाला काहीही सांगू नको असे म्हणून ग्रामसेविकेस खुर्चीवर ढकलत मारहाण केली, अशी तक्रार ग्रामसेविकेने केल्यावर याच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ढोक यांचे वर्तन गंभीर असून त्यामुळे जिल्हा परिषद व ग्रामसेवक संवर्गाची प्रतिमा मलीन झाली आहे. सार्वजनिक जीवनात महिलांची प्रतिष्ठा व सन्मानाला धक्का देणारे लांच्छनास्पद वर्तन ढोक यांच्याकडून झाले आहे.
परिणामी जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ढोक यांच्यावर दाखल गुन्हा गंभीर असून त्यांच्या वर्तनाने जिल्हा परिषदेची बदनामी झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विनय गौडा यांनी ढोक यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत ढोक यांचे मुख्यालय कराड पंचायत समिती असणार आहे.