कराड – संक्रांत आली की, महिलांना वेध लागतात ते हळदी-कुंकू कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात महिलांची ओटी भरून त्यांना वाण देण्याची प्रथा असल्याने कराडच्या बाजारपेठेत दरवर्षी लाखो रूपयांची उलाढाल होते. यावर्षी मात्र ही उलाढाल ठप्प होणार आहे. कारण कराडच्या महिलांनी पर्यावरणपूरक हळदी-कुंकू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सक्रांती ते रथसप्तमी या काळात महिला आपल्या सोयीनुसार घरी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे नियोजन करतात. आपल्या मैत्रिणी, शेजारील, पै-पाहुण्यांना घरी बोलावून त्यांची ओटी भरून त्यांना वाण दिले जाते. गेल्या काही वर्षात हे फॅड खूपच वाढले आहे. वाण म्हणून मिळणारी वस्तू कोणाची मोठी व चांगली आहे यावरूनही महिलांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी हा मुद्दा हेरून महिलांना अपेक्षित असणाऱ्या वस्तू बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्या आहेत. यामध्ये जादा करून प्लॅस्टिकच्याच वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू थोड्या स्वस्तात आणि आपल्याला हव्या तशा मिळत असल्याने महिलांचाही त्या खरेदी करण्याकडे ओढा असतो. मात्र यामुळे घरी प्लॅस्टीकच्या वस्तूंचाच जादा कचरा साठू लागला आहे.
गेल्या दोन वर्षात कराड शहराने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत चांगलीच आघाडी घेतली आहे. गतवर्षी तर देशात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. यंदाही शहरास अव्वल स्थान मिळेल अशी अपेक्षा असून त्या पद्धतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या काळात कराड पालिकेने प्लॅस्टीकविरोधी मोहिम आखली होती. शहरात प्लॅस्टीकला पूर्णपणे बंदी आणली आहे. त्याचा फायदा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी होणार आहे.
नगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला साथ देण्यासाठी महिलांनीही पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिवर्षी हळदी-कुंकू कार्यक्रमात स्वस्तात मस्त मिळणाऱ्या चिनी बनावटीच्या वस्तूंची देवाणघेवाण होते. यातील सत्तर टक्के वस्तू या प्लॅस्टिकच्याच बनवलेल्या असतात. त्याचे विघटनही होत नाही आणि ऱ्हासही होत नाही. त्यामुळे या वस्तूंना टाळण्याचा प्रयत्न कराड शहरातील महिला करणार आहेत.
त्यासाठी येथील इनरव्हील क्लबच्या काही महिलांनी पुढाकार घेतला आहे. घरोघरी तसेच महिला मंडळे व सोशल मिडीयावरून महिलांमध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. चिनी बनावटीच्या वस्तूंच्या मोहात न अडकता पर्यावरण पूरक वस्तूच वाण म्हणून द्या, अशी साद त्या महिलांना घालत आहेत. या उपक्रमामुळे कराड शहरात प्रतिवर्षी होणारी लाखो रूपयांची उलाढाल मात्र ठप्प होणार असून यंदाची संक्रांत पर्यावरणपूरक साजरी होण्यास मदत होणार आहे.