सकल जैन संघातर्फे आंदोलनाला दिशा; राजकीय पक्षांसह विविध संस्थांचा पाठिंबा
पुणे – महान जैन तीर्थक्षेत्र पालिताणाची सुरक्षा आणि झारखंडमधील सम्मेद शिखरजी जैन तीर्थक्षेत्राबाबत झारखंड सरकारने पर्यटन स्थळाबाबत घेतलेल्या निर्णयाचा निषेध करून, ही तीर्थक्षेत्रे वाचवणे सर्व जैन धर्मीयांसाठी महत्त्वाचे आहे. “जिन शासन हमारा है, हम जिन शासन के है’, हे तत्त्व लक्षात ठेवून तीर्थक्षेत्राच्या सुरक्षेसाठी सर्व जैन धर्मीयांनी एकत्र होणे आवश्यक असल्याचे मुनीश्री क्रांतिकारी प्रवचनकार जेपी गुरुदेव (म. सा.) यांनी सांगितले.
“तीर्थ रक्षा अभियाना’साठी सकल जैन संघाच्या माध्यमातून संघटित झालेल्या जैन समाजाला संबोधित करताना मुनीश्री जेपी (म. सा.) बोलत होते. यावेळी श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, श्री दिगंबर जैन संघ, स्थानकवासी श्रावक संघ, तेरा पंथी श्रावक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
मुनिश्री रॅलीलाही मार्गदर्शन करणार
यावेळी मुनीश्री क्रांतिकारी प्रवचनकार जेपी गुरुदेव (म. सा.) यांनी समाज माध्यमांचा वापर करून जैन तीर्थक्षेत्र सुरक्षेबाबत अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्याबाबत तरुणांना आवाहन केले. जैन समाज हा वेगवेगळ्या पंथांमध्ये विखुरलेला आहे. तो संघटित होणे आवश्यक असून, या आंदोलनात शिस्त, स्वच्छ पुणे आणि वेळ मर्यादेचे भान ठेवण्याची त्रिसूत्री त्यांनी सांगितली. या रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी मुनिश्री स्वतः रॅलीत सहभागी होणार आहेत.
यावेळी सकल जैन संघटनेचे अध्यक्ष अचल जैन आणि सदस्य विजयकांत कोठारी, मिलिंद फडे, भरत शहा, ललित गांधी यांच्यासह अभय छाजेड, राजेंद्र बाठिया, अनिल गेलडा यांनी जैन धर्मीयांना तीर्थक्षेत्र सुरक्षेसाठी मार्गदर्शन केले. यावेळी सर्वपक्षीयांसह पुणे शहरातील सर्व सामाजिक, धार्मिक संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दर्शवला.
यावेळी पुणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, भाजप नगरसेवक प्रवीण चोरबेले, मातंग समाजप्रमुख विठ्ठल साठे, पुणे शहर व्यापारी संघटना कॉंग्रेसचे भरत सुराणा, विहिंप-आरएसएस रमेश राठोड, शिख धर्मप्रमुख भोलासिंग अरोरा उपस्थित होते. बैठकीला तरुणांसह महिलाही उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अनिल गेलडा यांनी केले. श्री जैन सामुदायिक उत्सव समितीचे अध्यक्ष अचल जैन यांनी प्रस्ताविक केले.
महामोर्चा 9 जानेवारीला
सोमवार (दि. 9) सकाळी 9 वाजता सकल जैन संघातर्फे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, हा मोर्चा ओसवाल बंधू समाज, शंकरशेठ रोड येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. “सम्मेद शिखरजी बचाव’बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून, यावेळी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये देखील जैन बांधवांनी निवेदन देण्याचे ठरले आहे. या मोर्चास लाखो श्रावक संघटितपणे सहभागी होणार आहेत.