नवी दिल्ली – नववर्षात सर्वत्र उत्साह पाहायला मिळत असताना मोदी सरकारसमोर बेरोजगारीच्या दरावर नियंत्रण ठेवणे हे मोठे आव्हान असणार आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने बेरोजगारीबाबत काही आकडेवारी जाहीर केली आहे. त्या आकडेवारीनुसार, भारतातील बेरोजगारीचा दर डिसेंबर 2022 मध्ये 8.3% पर्यंत वाढला आहे, जो गेल्या 13 महिन्यांतील सर्वोच्च आहे.
देशातील शहरी बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये 8.96% वरून 10.09% पर्यंत वाढला आहे, तर ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 7.55% वरून 7.44% वर आला आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास म्हणाले, देशात बेरोजगारीचा दर वाढत आहे. कारण कामगार भागिदारीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. जी 2014 मध्ये 40.48 टक्के झाली आहे. डिसेंबरमध्ये हा गेल्या 13 महिन्यांतील उच्चांक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसेंबरमध्ये देशातील रोजगाराचा दर 37.1% इतका वाढला आहे, जो जानेवारी 2022 नंतरचा उच्चांक होता.
नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसद्वारे संकलित केलेल्या आणि नोव्हेंबरमध्ये जारी केलेल्या त्रैमासिक आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर या तिमाहीत बेरोजगारीचा दर 7.2% पर्यंत घसरला आहे, जो मागील तिमाहीत 7.6% होता.
हरियाणात सर्वाधिक बेरोजगारी दर
डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर हरियाणामध्ये 37.4% पर्यंत वाढला, त्यानंतर राजस्थान 28.5% आणि दिल्ली 20.8% वर पोहोचला आहे, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. येत्या 2024 मधील लोकसभा निवडणुकांपूर्वी देशातील महागाई रोखणे आणि रोजगार मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या लाखो तरुणांसाठी रोजगार निर्माण करणे हे मोदी सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. येत्या निवडणुकांमध्ये बेरोजगारीचा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. कॉंग्रेसकडून राहुल गांधी काढलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये देखील बेरोजगारीच्या मुद्द्यावर अनेकदा भाष्य करत आहे.